Raj Thackeray:' 'आधी इन्स्टाग्राममधून बाहेर पडा!"; राज ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या सभेत असं का सांगितलं?

Raj Thackeray’s Gudi Padwa Rally: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियाच्या अतिवापरावरून जोरदार टोलेबाजी केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Raj Thackeray Speech : राज ठाकरेंनी इन्स्टाग्रामचा वापर बंद करा, असं आवाहन केलं आहे.
मुंबई:

Raj Thackeray's Gudi Padwa Rally: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भाषण केलं. सत्तेला कोणी प्रश्न विचारू नये यासाठी जाणीवपूर्वक जनतेला करमणुकीच्या जाळ्यात अडकवले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. विशेषतः तरुणाईला उद्देशून बोलताना त्यांनी इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियाच्या अतिवापरावरून जोरदार टोलेबाजी केली. महाराष्ट्राचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि भविष्यातील सत्ता काबीज करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी या सभेत केले.

करमणुकीची गटारगंगा आणि सत्तेचे राजकारण

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आजच्या काळात लोकांना मूलभूत प्रश्न विचारण्यापासून रोखण्यासाठी चित्रपट, आयपीएल आणि सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. ही एक प्रकारची सोय असून लोकांना सतत मनोरंजनात गुंतवून ठेवले जात आहे जेणेकरून ते सरकारला जाब विचारणार नाहीत. 

Advertisement

महाराष्ट्राचे अस्तित्व दिवसेंदिवस मिटवले जात असताना लोकांनी तातडीने इन्स्टाग्रामच्या आभासी जगातून बाहेर पडणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. हा प्रकार केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात जाणीवपूर्वक राबवला जात असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

मोबाईलमधूनच निषेध

पूर्वी अन्यायाविरुद्ध लोक रस्त्यावर उतरत असत, मात्र आता केवळ मोबाईलवर निषेध व्यक्त केला जात असल्याची खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. सोशल मीडिया आणि करमणुकीच्या या गटारगंगेत सर्वसामान्य माणूस अडकून पडला आहे. माध्यमांच्या स्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की कोणी सरकारला विरोध केला तर त्यांच्या जाहिराती बंद करण्याची धमकी दिली जाते. अशा विचित्र आणि दबावाच्या परिस्थितीत सध्या देश अडकला असून, जनतेने या विळख्यातून बाहेर पडून वास्तवाचे भान ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

आंतरराष्ट्रीय धोरणांवर टीका

आंतरराष्ट्रीय विषयाला हात घालत राज ठाकरे यांनी इराण आणि इस्रायल युद्धाच्या संदर्भात भारताच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, इराण हा देश अनेक वर्षे भारताच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि आपल्याला रुपयामध्ये तेल पुरवतो. जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावरही इराणने भारताचे समर्थन केले होते. 

मात्र, इराणवर हल्ले होत असताना किंवा तिथले नेतृत्व गेल्यानंतरही भारताच्या पंतप्रधानांनी निषेधाचे एकही वक्तव्य केले नाही, ही खेदाची बाब आहे. अडचणीच्या काळात आपण इराणची साथ दिली नाही, याचा फटका भविष्यात देशाला नक्कीच बसेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Advertisement

मनसेचा 20 वा वर्धापनदिन आणि सत्तेचा संकल्प

मनसेच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरताना राज ठाकरे यांनी सत्तेचा संकल्प व्यक्त केला. आपण सर्वजण या ठिकाणी केवळ महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलो आहोत, असे त्यांनी सांगितले. भविष्यात आपल्याला राज्याची सत्ता आपल्या हाती घ्यायची आहे आणि ती आपण घेणारच, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि प्रगतीसाठी मनसे सज्ज असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.

Topics mentioned in this article