RSS News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांतात संघटनात्मक विस्तार वेगाने होत असून गेल्या वर्षाच्या तुलनेत कामात 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत कोकण प्रांत संघचालक अर्जुन चांदेकर आणि प्रांत कार्यवाह विठ्ठलराव कांबळे यांनी ही माहिती दिली. हरियाणा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेतील चर्चेच्या पार्श्वभूमीवर कोकण प्रांतातील कार्याचा आढावा यावेळी मांडण्यात आला.
कोकण प्रांतातील वाढता विस्तार
विठ्ठलराव कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोकण प्रांतात एकूण 694 शाखा, 442 साप्ताहिक मिलन आणि 79 मासिक मिलन सुरू आहेत. विशेषतः मुंबई महानगर क्षेत्रात संघाचे जाळे अधिक घट्ट झाले असून येथे 258 शाखा, 155 साप्ताहिक मिलन आणि 24 मासिक मिलन सक्रिय आहेत. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत 8 टक्के इतकी असून संघाचा प्रभाव शहरासह ग्रामीण भागातही वाढत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.
शताब्दी वर्षानिमित्त भव्य जनसंपर्क
संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने कोकण प्रांतात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण प्रांतात 386 ठिकाणी विजयादशमी उत्सव साजरा झाला, ज्यामध्ये 43,500 पूर्ण गणवेशधारी स्वयंसेवक सहभागी झाले होते. या उत्सवांना 37,040 पुरुष आणि 22,709 महिला नागरिकांनी उपस्थिती लावत संघाच्या कार्याला पाठिंबा दर्शवला. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात राबवलेल्या विशेष घर संपर्क मोहिमेत 3,740 स्वयंसेवकांनी 3,17,679 घरांपर्यंत पोहोचून लोकांशी थेट संवाद साधला.
( नक्की वाचा : Viral Girl मोनालिसाच्या लग्नामागे मोठं षडयंत्र? '35 तुकडे' आणि 'सीरिया'च्या दाव्याने खळबळ! )
भविष्यातील उपक्रम आणि युवा संमेलने
येणाऱ्या काळात कोकण प्रांतात हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी मोठ्या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शहरी भागात 2500 हून अधिक आणि ग्रामीण भागात 600 हून अधिक हिंदू संमेलने घेतली जाणार आहेत. तसेच समाजातील विविध स्तरांतील लोकांशी संवाद साधण्यासाठी 147 सद्भाव बैठका आणि 27 प्रमुख व्यक्ती जनसंवाद कार्यक्रम आयोजित केले जातील. तरुणांना राष्ट्रकार्याशी जोडण्यासाठी विशेषतः 270 युवा संमेलनांचे आयोजन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
शताब्दी वर्षाचा संकल्प आणि पंच परिवर्तन
संघाचे शताब्दी वर्ष विजयादशमी 2025 पासून सुरू झाले असून ते विजयादशमी 2026 पर्यंत चालणार आहे. या विशेष वर्षात संघाने पंच परिवर्तन या पाच सूत्रीवर विशेष भर देण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्ये, स्वबोध आणि पर्यावरण संरक्षण या विषयांचा समावेश आहे. या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न स्वयंसेवकांमार्फत केला जाणार आहे.