अमजद खान
कल्याण आरटीओ क्षेत्रात शेअर रिक्षासाठी भाडेवाढ लागू झाली आहे. त्याच बरोबर मिटरवर चालणाऱ्या रिक्षांची ही भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कल्याणकरांच्या खिशाला चाट लागणार आहे. नवा भाडेवाढी नुसार मीटरने चालणाऱ्या रिक्षांच्या भाड्यात 3 रुपये वाढ झाली आहे. तर शेअर भाड्यात 3 ते 5 रुपयांनी वाढ झाली आहे. कल्याणमध्ये अनेक ठिकाणी शेअर रिक्षा धावतात. त्यातून प्रवास करणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. महापालिकेच्या पब्लिक ट्रान्सपोर्ट पेक्षा शेअर रिक्षाकडे कल्याममधील नागरिकांचा अधिक कल आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रिक्षाची भाडे वाढ चार महिन्याच पूर्वी सरकारने दिली होती. पुर्वी रिक्षाचे कमीत कमी मीटर भाडे 23 रुपये होते. त्यात आता तीन रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जर जवळच्या जवळ जरी मिटरने जायचे असेल तर 26 रुपये खर्च करावे लागणार आहेत. प्रवाशांवर अचानक बोजा पडू नये म्हणून ही भाडेवाढ चार महिन्या आधी लागू केलेली नव्हती, असं यावेळी रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष संतोष नवले यांनी स्पष्ट केलं.
रिक्षा मीटरचे काही तात्रीक गोष्टी करायच्या होत्या. आता त्याचे 95 टक्के काम झाले आहे असं ही नवले यावेळी म्हणाले. वाहतूक शाखेकडून ओवर सीटवर कारवाई सुरु केली आहे. जास्त सिट घेतल्या तर दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. हे अन्यायकारक आहे असं ही ते म्हणाले. याबाबत सरकारकडे दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितले. सध्या जी भाडेवाढ झाली आहे ती प्रत्येक रूटवर झाली असल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं.
कल्याण शहरात ही भाडेवाढ लागू होणार आहे. त्यानुसार शेअर रिक्षात तीन ते चार रुपये भाडे वाढ करण्यात आलेली आहे. महागाई ही प्रत्येकाला आहे. त्यानुसार रिक्षा चालकांनाही महागाई आहे. प्रत्येक गोष्टीचे दर वाढले आहे. त्यामुळे ही भाडेवाढ गरजेची होती. या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने ही भाडेवाढ दिली आहे. प्रवाशांनी ही बाब समजून घेतली पाहीजे. त्यांनी ही आता ही भाडेवाढ मान्य केली पाहीजे. वाढीव भाडे कोणताही वाद न घातला प्रवाशांनी द्यावे असे आवाहन ही त्यांनी या निमित्ताने केले आहे.