आदित्य ठाकरेंचं दसरा मेळाव्यातील पहिलं भाषण; म्हणाले, सत्तेत आल्यावर 'या' ३ मुद्द्यांवर करणार काम! 

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच जनतेला संबोधित केलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच जनतेला संबोधित केलं. महाराष्ट्रात सत्तेत आल्यावर आम्ही या तीन गोष्टींवर काम करणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. आपल्या पहिल्या वाहिल्या भाषणाच्या सुरुवातील त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख केला. 

ते म्हणाले, आज पहिल्यांदा मी दसरा मेळाव्यात भाषण करीत आहे. आणि मनात अनेक आठवणी भरून येत आहेत. लहानपणी वर्षातील महत्त्वाचा दिवस हा दसरा. कारण यादिवशी आज्याचं (बाळासाहेब ठाकरे) भाषण. त्यावेळी खाली जमिनीवर गवतात आम्ही बसायचो. 2010 साली युवासेना स्थापन केली. आणि बाळासाहेबांनी तलवार हातात दिली आणि ताकद दिली. देशासाठी, राज्यासाठी लढण्याची ताकद दिली. गेली दहा ते 14 वर्षे वडिलांचं, आज्याची भाषणं ऐकली. गेल्या 14 वर्षात मी कधीच भाषण केलं नाही. मात्र २०२४ हे वर्ष महत्त्वाचं आहे. ही सर्वात मोठी अन् महत्त्वाची लढाई आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान 6 जानेवारीला अरविंद सावंत यांच्यासाठी मी सभा घेतली होती. त्यावेळी मी म्हणालो, ज्या लोकसभा आणि विधानसभेत आपल्याला बदल घडवायचा आहे. ते 2024 हे वर्ष आहे. तो क्षण आता जवळ आला आहे. 

ही लढाई महत्त्वाची आहे. मात्र वैयक्तित नाही, सरकार बनवण्यासाठी नाही. सरकारकडून जी लूट चालली आहे, मुंबई विकली जात आहे त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. महाराष्ट्राची लूट थांबवायची असेल तर आपली एकजूट हवी. मिंदे सरकारने अनेक भ्रष्टाचार केलंत. रस्त्यांचे घोटाळे केले. मागल्या वर्षी मी शिंदे सरकारचा रस्त्यांचा घोटाळा उघड केला होता. त्यावेळी पंतप्रधानांना सांगितलं होतं की, तुमच्याकडून जे भूमिपूजन करून घेतलं जात आहे ते प्रत्यक्षात कधी होणार नाही. अजूनही पाच हजार कोटींचा घोटाळा डोळ्यासमोर आहे. गेल्या दोन वर्षात एकही रस्ता तयार झाला नाही. खोके सरकार नागरिकांना जातीय-धर्माच्या दंगलीत व्यस्त ठेवत आहेत. 

नक्की वाचा - Uddhav Thackeray : 'शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्र मोदी-शाहांचा होवू देणार नाही'; दसरा मेळाव्यात ठाकरेंची शपथ

मिंधे सरकारने शाळेच्या गणवेशातही घोटाळा केला. दावोसमधील एका दौऱ्यातून आम्ही महाराष्ट्रासाठी 80 हजार कोटींची गुंतवणूक आणून दाखवली होती. मिंधे सरकार दोन वेळा गेला. तेव्हा त्यांनी दावोसला जाण्यासाठी 40 ते 45 कोटी उडवले. मात्र सरकारमध्ये आल्यावर प्रत्येकाची फाईल काढणार. माझा गुजरातशी वैयक्तिक वाद नाही. मात्र जेव्हा महाराष्ट्राच्या हक्काचं दुसऱीकडे ओरबडून घेऊन गेलं जातं त्यासाठी मी लढणार. आमचं सरकार सत्तेत आल्यावर तीन महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी काम करणार. नोकरी नोकरी आणि तिसरं नोकरीच. सद्यस्थितीत नोकरीची नितांत आवश्यकता आहे. 

राज्यातील स्पर्धा परीक्षांची वाईट अवस्था आहे. तरुण-तरुण चार पाच वर्षे यासाठी परीक्षा देतात. पोलीस कॉन्स्टेबलपदासाठीही तिच परिस्थिती. साडे सतरा हजार पदांसाठी 18 लाख अर्ज आले होते. तरुण मुलामुलींना एकच गोष्ट हवीये. हाताला काम. आपल्याला विजय प्राप्त करायचाय. मशालीने पुन्हा एकदा महाराष्ट्राला सुवर्णकाळाकडे न्यायचंय.