नितेश राणे म्हणाले, 'हिरवा साप', मनसेचाही हिसका; स्टँडअपदरम्यान मुनव्वर नेमकं काय म्हणाला?  

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांशी बोलत असताना कोकणाचा विषय निघाला होता. त्यावेळी मुनव्वरने यासंबंधित वक्तव्य केलं होतं.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी (Standup comedian Munawar Farooqui) यांनी आपल्या कार्यक्रमादरम्यान केलेल्या व्यक्तव्यावरून मनसेसह भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोकणी माणसाबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय नेत्यांकडून टीकेचा भडिमार केला जात आहे. मात्र मुनव्वरच्या अनेक चाहत्यांनी राजकीय नेत्यांकडून अतिरेक केला जात असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान मुनव्वर फारूखी याने ट्विट करीत याबाबत माफी मागितली आहे.  

आपल्याला कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. आपल्याकडून ते शब्द अनावधानाने निघाले होते. तसेच आपले कोकणावर अफाट प्रेम आहे, असंही मुनव्वर म्हणाला आहे. मुनव्वर फारुकीने कोकणी माणसाबद्दल अपशब्द वापरला होता. त्याचा कोकणी माणसाबद्दल अपशब्द वापरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर मनसे, शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून आक्षेप घेण्यात आला होता. याशिवाय मुनव्वर फारुकीवर सोशल मीडियावर टीकेचा भडीमार झाला होता. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता मुनव्वर फारुकीने X (ट्विटर)वर बातमी शेअर करत जाहीर माफी मागितली आहे.

नक्की वाचा - देवेंद्र फडणवीसच BIGG BOSS! भाजपच्या बैठकीत विधानसभेसाठी काय रणनीती ठरली?

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांशी बोलत असताना कोकणाचा विषय निघाला होता. मला माहिती आहे की, तळोजामध्ये खूप कोकणी लोकं राहतात. माझे अनेक कोकणी मित्र तळोजामध्ये राहतात. पण नागरिकांच्या भावना त्यामुळे दुखावल्या आहेत. कारण त्यांना वाटतंय की, मी कोकणबद्दल काही म्हणालो आहे. मी कोकणची टिंगल उडवली आहे. पण तसं नाहीय. माझा तो हेतू नव्हता”, असं स्पष्टीकरण मुनव्वर फारुकीने दिलं.

‘मी मनापासून आपल्या सर्वांची माफी मागतो'
संबंधित शब्द हे प्रेक्षकांसोबत संवाद साधत असताना अनावधानाने माझ्या मुखातून निघाले होते. पण मी आता पाहिलं की, त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. माझा एक स्टॅंडअप कॉमेडियन म्हणून सर्वांना हसवण्याचा हेतू असतो. माझ्यामुळे कुणी दु:खी होऊ नये, असं मला वाटतं. कोणत्याही कारणामुळे कुणी माझ्यामुळे दु:खी होऊ नये, असं मला वाटतं. त्यामुळे मी मनापासून आपल्या सर्वांची जाहीर माफी मागतो, असं मुनव्वर म्हणाला.

Advertisement

मुन्नवर नेमकं काय म्हणाला होता?
मुनव्वर फारुकी स्टँडअप कॉमेडी करत असताना तो प्रेक्षकांना “मुंबईतून सर्वजण आले आहेत ना?”, असं विचारतो. “कुणी लांबून प्रवास करुन आलं नाही ना?”, असं विचारतो. यावेळी प्रेक्षकांमधील एकजण आपण तळोजा येथून आल्याचं सांगतो. त्यावर मुन्नवर बोलतो, “अच्छा आज विचारलं प्रवास करुन आलात का? तर तळोजा म्हणून सांगत आहात. तळोजा मुंबईपासून वेगळा झाला. पण यांचे गाववाले जेव्हा यांना विचारतात की, कुठे राहतात? तर मुंबईत राहतात असं सांगतात. हे कोकणी लोकं सर्वांना चु** बनवतात”, असं वादग्रस्त वक्तव्य मुनव्वर फारुकी करतो. मुन्नवरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे.