Kalyan Shil Road Traffic Issue : कल्याण-शीळ मार्गावरील मेट्रोच्या कामामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीवरून आता राजकारण तापलं आहे.भाजपाने रस्त्याची पाहणी करत कंत्राटदार आणि स्थानिक आमदार राजेश मोरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.'राज्यात सत्ता तुमची मुख्यमंत्री तुमचे' निर्णय तुम्ही का घेत नाही? असा सवाल करत मनसेने भाजपवर जोरदार टीका केली आहे.कल्याण-शीळ मार्गावरील मेट्रोच्या कामामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून वाहनचालक,विद्यार्थी आणि नागरिक वाहतूक कोंडीचा सामना करत आहेत.पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर झाली असून नागरिकांचा संताप वाढत आहे.
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास
भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या निर्देशानंतर भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे,शशिकांत कांबळे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी कल्याण-शील मार्गाची पाहणी केली.मेट्रोच्या कामातील कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.यापुढे कामात निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही.संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून आवश्यक नियोजन सुरू असल्याचा दावा भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केला.यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी मतदारसंघाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीकाही अप्रत्यक्षपणे आमदार राजेश मोरे यांच्यावर करण्यात आली.
नक्की वाचा >> Lonavala News: लोणावळ्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर! 'त्या' पर्यटनस्थळावर लोकांची होतेय तुफान गर्दी, Video
मंत्रालयात बैठक घेऊन मेट्रोच्या कामाबाबत ठोस निर्णय..
दरम्यान,भाजपाच्या या पाहणी दौऱ्यावर मनसेनेही जोरदार प्रतिक्रिया दिली.राज्यात सत्ता आणि मुख्यमंत्री भाजपाचे असताना केवळ पाहणी करण्यापेक्षा मंत्रालयात बैठक घेऊन मेट्रोच्या कामाबाबत ठोस निर्णय घ्यावा,काम बंद करून टाका अशी मागणी मनसेने केली. मेट्रोचे काम,वाहतूक व्यवस्थापन आणि नियोजनाबाबत नागरिकांना कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही, असा आरोप मनसेने केला आहे.
नक्की वाचा >> Dhule News: धु्ळ्यातही 'ऑपरेशन टायगर', ठाकरे गटाला धक्का, महाराष्ट्र महिला आघाडीच्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
तसेच यापूर्वी आमदार राजू पाटील असताना पावसाळ्यापूर्वी नालेसफाई वेळेत होत असल्याने अशी परिस्थिती निर्माण होत नव्हती.मात्र आता नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची टीकाही मनसेकडून करण्यात आली.