निनाद करमरकर, उल्हासनगर
Ulhasnagar News : सहा तास वाट बघूनही 108 रुग्णवाहिका न आल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात घडली होती. याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांचं निलंबन झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा असाच एक प्रकार समोर आला आहे. 108 रुग्णवाहिका न आल्यानं रेल्वे अपघातात पाय गमावलेल्या महिलेला 2 तास ताटकळत राहावं लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
उल्हासनगर रेल्वे स्थानकात शनिवारी दुपारी कमल साबळे या महिलेचा रेल्वे अपघात झाला. या अपघातात महिलेनं आपले दोन्ही पाय गमावले. या महिलेला रेल्वे स्थानकातून मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यासाठी 108 रुग्णवाहिका बोलावण्यात आली. पण 1 तास वाट पाहिल्यानंतर ही रुग्णवाहिका आली.
मध्यवर्ती रुग्णालयात गेल्यानंतर तिथून या महिलेला सायन हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं. पण पुन्हा 108 रुग्णवाहिका बोलावल्यानंतर 1 तास रुग्णवाहिका न आल्यानं नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिका बोलावली. पण त्यांनी 3500 रुपये सांगितले.
याबाबत पत्रकारांनी विचारणा करताच मध्यवर्ती रुग्णालयाने स्वतःची रुग्णवाहिका देत या महिलेला सायन हॉस्पिटलमध्ये पाठवलं. या सगळ्या प्रकारात पुन्हा एकदा 108 रुग्णवाहिका।किती बेभरवशी आहे, हे समोर आलं आहे. त्यामुळे आता तरी सरकारनं डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी 108 रुग्णवाहिकेच्या यंत्रणेवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.