Kalyan Dombivli Water Cut Issue : यंदा मान्सून लांबण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दिवसेंदिवस उष्णतेच्या झळा वाढत असून पाणी टंचाईची समस्याही डोकं वर काढू लागली आहे. कल्याण-डोंबिवलीतही पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने जलसंपदा विभागासोबत महत्त्वाची बैठक घेऊन पाणीपुरवठा कपातीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार,कल्याण-डोंबिवली शहरात सोमवार 11 मे रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते मंगळवार 12 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सलग 24 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला
पावसाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता आणि उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी ही कपात आवश्यक असल्याचे केडीएमसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवावे,तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा,असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यात 'या' ठिकाणी नसरापूर घटनेची पुनरावृत्ती, गिरणी चालकाच्या संतापजनक कृत्याने महाराष्ट्र हादरला
नागरिकांनी संयम बाळगावा आणि..
पाणीपुरवठा बंद असलेल्या कालावधीत नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे,असेही सांगण्यात आले आहे.या कपातीमुळे नागरिकांना काही प्रमाणात गैरसोय होणार असली तरी दीर्घकालीन पाणी व्यवस्थापनासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे, अशी माहिती पाणीपुरवठा अभियंता शैलेश मळेकर यांनी दिली आहे.