वरळी हिट अँड रन प्रकरण, आरोपी मिहिर शहाविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी
वरळी हिट अँड रन अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहा याच्या नावाने लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. वरळी पोलिसांची ही कारवाई केली आहे. मिहिर शहा हा परदेशात पळून जाऊ शकतो असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे मिहिर शहा परदेशात पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी लूक आऊट सर्क्युलर जारी केलं आहे. मिहिर शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अपघातानंतर फरार झालेल्या मिहिर शहाला पकडण्यासाठी पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा देखील करणार समांतर तपास करत आहे. या प्रकरणी दोन आरोपीना पोलिसांनी अटक केली असून अद्याप मिहीर शहाचा शोध सुरु आहे.
काय आहे प्रकरण?
रविवार 6 जुलैच्या पहाटे कोळी दाम्पत्य मच्छी आणण्यासाठी ससून डॉक येथे गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना पहाटे 5.30 च्या सुमारास कारने या दाम्पत्याला धडक दिली. वरळीच्या अटरिया मॉल परिसरात ही घटना घडली. भरधाव कारने दोघांना धडक देत काही अंतरावर फरफटत नेलं. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला तर पती जखमी झाला. अपघातानंतर मिहिर शहाने घटनास्थळावरुन पळ काढला. अजूनही मिहिर पोलिसांच्या हाती लागलेले नाही.
मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा
मुख्यमंत्री कार्यालयाच्या X पोस्टमध्ये म्हटले आहे की, "महाराष्ट्रामध्ये ‘हिट अँड रन' च्या घटनांमध्ये कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काही धनदांडगे, राजकारणी लोक त्यांच्या पदाचा गैरवापर करून व्यवस्था वाकविण्याचा प्रयत्न करत असतील तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. सर्वसामान्य नागरिक हे आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ‘हिट अँड रन' सारखी प्रकरणे अत्यंत गांभीर्याने हाताळावीत आणि पीडितांना न्याय देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणांमध्ये दोषी कुणीही असो, मग तो कितीही श्रीमंत, प्रभावशाली, किंवा नोकरशहा, लोकप्रतिनिधींची मुलं तसेच कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी व आमचे शासन पीडित आणि त्यांच्या कुटुंबिंयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सर्व जनतेसाठी, सुरक्षित महाराष्ट्रासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. "