- आयपीएल २०२६ मध्ये वैभव सूर्यवंशीने अप्रतिम फटकेबाजी करत क्रिकेट विश्वावर छाप सोडली आहे
- सचिन तेंडुलकरने वैभवच्या फलंदाजीचे तांत्रिक कौशल्य आणि मनगटाचा उत्कृष्ट वापर यावर विशेष कौतुक व्यक्त केले
- सचिनने वैभवला नैसर्गिक खेळ कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
Sachin Tendulkar Praise Vaibhav Suryavanshi Batting IPL 2026: आयपीएल 2026 मध्ये आपल्या फटकेबाजीने क्रिकेट जगताला वैभव सूर्यवंशीने थक्क केले आहे. अवघ्या 15 व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली आहे. त्याच्या या खेळावर आता खुद्द क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर कमालीचा प्रभावित झाला आहे. मुंबईत पार पडलेल्या 'क्रिकइन्फो ऑनर्स' सोहळ्यात सचिनने वैभवचे तोंडभरून कौतुक केले. या सोहळ्यात सचिनला 21 व्या शतकातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फलंदाज म्हणून गौरवण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सचिनने वैभवच्या भविष्यकालीन वाटचालीवर आणि त्याच्या कसोटी क्रिकेटमधील प्रवेशावर महत्त्वपूर्ण भाष्य केले.
सचिन तेंडुलकरने वैभवच्या फलंदाजीचे तांत्रिक विश्लेषण केले. तो म्हणाला की , "सध्या सर्वत्र वैभवचीच चर्चा सुरू आहे. मी त्याची फलंदाजी पाहिली आहे. तो खरोखरच एक विशेष गुणवत्ता असलेला खेळाडू आहे. त्याच्याकडे केवळ चेंडू सीमापार धाडण्याची ताकदच नाही, तर त्याच्याकडे मनगटाचा (Wrist Work) अतिशय सुंदर वापर करण्याची कला आहे. मैदानाभोवती चौफेर फटकेबाजी करण्यासाठी मनगटाचा वापर महत्त्वाचा ठरतो. तो इतर फलंदाजांच्या तुलनेत चेंडूची लाईन आणि लेंथ खूप आधी ओळखतो. जे त्याचे सर्वात मोठे बलस्थान आहे असं सचिनने सांगितलं.
वैभवने कसोटी क्रिकेट खेळावे का, या प्रश्नावर सचिनने संयमी आणि सकारात्मक भूमिका घेतली आहे. सचिन म्हणाला, "त्याने सध्या आहे तसाच आपला नैसर्गिक खेळ सुरू ठेवावा. कसोटी क्रिकेटचे आव्हान वयानुसार आणि अनुभवाने तो नक्कीच शिकेल. क्रिकेटमध्ये आव्हाने आणि समस्या तुमच्या कारकिर्दीच्या शेवटच्या चेंडूपर्यंत कायम राहतात. गोलंदाज प्रत्येक चेंडूवर तुम्हाला प्रश्न विचारत असतो, त्याचे उत्तर शोधणे हे फलंदाजाचे काम आहे. वैभव अत्यंत आत्मविश्वासाने खेळतो, त्यामुळे त्याच्या नैसर्गिक खेळात कोणीही हस्तक्षेप करू नये असं सचिनने सांगितलं. शिवाय वैभवच्या कसोटी क्रिकेट खेळण्याबाबत सकारात्मक दिसला.
राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभव सूर्यवंशीने चालू आयपीएल हंगामात गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली आहेत. त्याने एका ही गोलंदाजाला सोडलं नाही. दिग्गजांचे चेंडू ही त्याने सिमापार धाडले. भारताचा आघाडीचा गोलंदाज बुमराला ही त्याने षटकार ठोकले होते. त्याने 237.31 च्या अद्भूत स्ट्राईक रेटने तब्बल 776 धावा कुटल्या आहेत. यादरम्यान त्याने 72 गगनचुंबी षटकार ठोकले आहते. 2012 मध्ये क्रिस गेलने प्रस्थापित केलेला 59 षटकारांचा 14 वर्षे जुना ऐतिहासिक विक्रम मोडीत काढला आहे.