T20 World Cup 2026, Ind vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 वर्ल्डकप 2026 चा शेवटचा सुपर 8 चा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर रंगला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत 20 षटकांमध्ये 4 बाद 195 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर या धावांचं टार्गेट गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला. संजू सॅमसनने धावांचा पाऊस पाडत 50 चेंडूत नाबाद 97 धावा केल्या. या धावांच्या जोरावर भारताने 19.2 षटकात 5 विकेट्स गमावून 199 धावा केल्या आणि ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली. त्यामुळे भारत वर्ल्डकपच्या सेमी फायनलसाठी क्वालीफाय झाला असून वेस्ट इंडिजचा संघ वर्ल्डकपमधून बाहेर गेला आहे.
भारतासाठी सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. या सामन्यातही अभिषेकला धावांचा सूर गवसला नाही. अकील होसेनच्या गोलंदाजीवर शर्मा फक्त 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर वन डाऊनसाठी मैदानात उतरलेल्या इशान किशनलाही धावांचा पाऊस पाडता आला नाही. इशानही 10 धावांवर बाद झाल्याने भारताला मोठा धक्का बसला होता. परंतु, संजू सॅमसने सावध खेळी करून वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला आणि अर्धशतकी खेळी केली. कर्णधार सूर्यकुमार यादवने 16 चेंडूत 18 धावांची खेळी केली. जोसेफच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार झेलबाद झाला. हार्दिक पंड्याने 17 तर तिलक वर्माने 27 धावा केल्या.