Akole News : स्वातंत्र्याला 78 वर्षे उलटली तरीही गावात रस्ता नाही, आदिवासी महिलेची प्रसूती जंगलात उघड्यावर

स्वातंत्र्यानंतर 78 वर्षे उलटूनही रस्त्याअभावी गरोदार मातेला जंगलात बाळाला जन्म द्यावा लागला.

जाहिरात
Read Time: 3 mins

गावात पोहोचण्यासाठी रस्ता नसल्यामुळे एका आदिवासी महिलेची प्रसूती जंगलातच उघड्यावर करण्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यातील जांभळे गावच्या शिवारात घडली. स्वातंत्र्यानंतर 78 वर्षे उलटूनही रस्त्याअभावी जंगलातच प्रसूती होणं ही दुर्दैवी बाब असून यावरून सामान्य नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मात्र मुख्याध्यापक राजेंद्र गवांदे यांच्या धडपडीमुळे प्रसूतीनंतर बाळ आणि बाळंतीण आरोग्य केंद्रात सुखरूप पोहोचले. त्यामुळे त्यांना पुढील उपचार मिळू शकले.

मुख्याध्यापक राजेंद्र गवांदे यांचे माजी विद्यार्थी दशरथ मधे हे त्यांच्या घरी धावत आले. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या पत्नीची प्रकृती बिघडली असून गाडी घेऊन तातडीने ठाकरवाडीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. गवांदे यांनी तत्काळ आपली कार घेतली. मात्र मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला होता. परिणामी गाडी मध्येच अडकली. त्याच वेळी प्रतीक्षा मधे या गर्भवती महिलेला वाडीपासून रस्त्याच्या दिशेने चालत आणत असताना घाटातच प्रसूतीवेदना सुरू झाल्या. त्यावेळी जवळ कोणतंही वैद्यकीय साहित्य नव्हते आणि परिस्थिती अत्यंत कठीण होती. मात्र तिच्या सासू, आई आणि वाडीतील एका महिलेने धीर करून जंगलातच सुरक्षित प्रसूती केली.

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गवांदे यांनी बाळंतीण आणि नवजात बाळाला गाडीतून रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला. पण गाडी चिखलात अडकली होती. त्यानंतर वाडीतील मित्रांनी एकत्र येऊन गाडी ढकलून बाहेर काढली. दरम्यान ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांच्याशी सतत संपर्कात राहत गवांदे यांनी तात्काळ रुग्णवाहिका मागवली. अखेर सर्वजण सुखरूप रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचले. नवजात बाळ आणि मातेची प्रकृती स्थिर आहे.

Advertisement

या घटनेमुळे ठाकरवाडी रस्त्याच्या अपूर्ण आणि अर्धवट अवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 2015  मध्ये ग्रामपंचायतीने दोन किलोमीटर लांबीचा घाटरस्ता सुरू केला होता. मात्र अपुऱ्या निधीमुळे काम थांबले. नंतर शासनदरबारी अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. परंतु वनविभागाच्या अडथळ्यांमुळे रस्ता आजही पूर्ण होऊ शकलेला नाही.

Advertisement

नक्की वाचा - Pune News : पुण्यात भरधाव कारने 12 जणांना उडवले, MPSC चे विद्यार्थी जखमी

स्वातंत्र्यपूर्व काळापासून या वाडीतील शेकडो आदिवासी बांधव अजूनही जंगलातील अरुंद पायवाटांनी, पावसाळ्यात चिखलात वाट काढत, आजारी मातांना डोलीने किंवा खांद्यावर उचलून दवाखान्यात नेतात. मुलभूत आरोग्य सेवा मिळवण्यासाठी त्यांना जीव धोक्यात घालावा लागतो.

सुदैवाने यावेळी प्रतीक्षा मधे आणि तिचं नवजात बाळ सुखरूप आहेत. मात्र हे केवळ नशिबाने घडलं. पुढच्यावेळी असं काही घडलं तर त्याचे गंभीर परिणाम येथील नागरिकांना भोगावे लागू शकतात. शासनाने आणि प्रशासनाने या भागातील रस्त्यांच्या कामाकडे तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक आहे. देश विकासाच्या मार्गावर जात असताना रस्ता हा मूलभूत हक्क आहे. 

सुदैवाने बाळ आणि आई दोघेही सुरक्षित आहेत. यानिमित्ताने ठाकरवाडीचा रस्ता केव्हा पूर्ण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारदरबारी पाठपुरावा करूनही वनविभागाच्या अडचणीमुळे तो सुटत नाही. आजही आमचे आदिवासी बांधव अशा रस्त्याविना प्रवास करतात. २०१५ मध्ये ग्रामपंचायतीने हा दोन किलोमीटर लांबीचा अवघड घाटरस्ता सुरू केला होता. मात्र अपुऱ्या निधीमुळे काम थांबले.

दुर्घम भागातील वाड्यावस्त्यांवरील प्रश्न अद्यापही सुटले नसल्याचं या घटनांवरुन समोर आलं आहे. 

Topics mentioned in this article