Amity University Student Slapped Video : कॉलेज परिसरात होणारे रॅगिंग किंवा विद्यार्थ्यांची दादागिरी हे विद्यार्थी आयुष्यावर मोठा परिणाम करणाऱ्या घटना आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थी दादागिरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील अॅमिटी युनिव्हर्सिटीच्या एका विद्यार्थ्याला त्याच्याच सहकाऱ्यांनी एका कारमध्ये बसवून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
26 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेचा 101 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक मुलगी ‘हात खाली कर' असे ओरडत विद्यार्थ्याला सतत थप्पड मारताना दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी शिखर मुकेश केसरवानी हा बीए एलएलबीच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. तो 26 ऑगस्ट रोजी आपल्या मैत्रिणीसोबत गाडीतून कॉलेजला गेला होता. कॉलेजच्या पार्किंगमध्ये काही आरोपींनी त्याला अडवले आणि त्याच्याशी बोलण्याच्या बहाण्याने गाडीत प्रवेश केला. जवळपास 45 मिनिटे त्यांनी शिखरला शिवीगाळ करत धमकावले. या प्रकारामुळे शिखर सध्या मानसिक धक्क्यात आहे. तो आता कॉलेजला जात नाहीय, अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली,
व्हिडिओमध्ये एक विद्यार्थिनी शिखरच्या डाव्या गालावर सतत थप्पड मारत असल्याचे दिसत आहे. त्यावेळी तो बचाव करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला ‘हात खाली कर' असे धमकावले जाते. बाजूला बसलेला एक विद्यार्थी त्याच्या उजव्या हाताला हिसका देऊन त्याला एक ठोसा मारतो.
( नक्की वाचा : Akola News : अकोल्यात वंचितच्या नेत्याच्या मुलावर 7 वार; संतप्त समर्थकांकडून आरोपीचे वाहन जाळून हल्ला )
वडील मुकेश केसरवानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा नुकताच एका शस्त्रक्रियेतून बरा झाला होता. आरोपी जाह्नवी मिश्रा आणि आयुष यादव यांनी त्याला 50-60 थप्पड मारल्या, तर विवेक सिंग आणि मिलय बॅनर्जी यांनी मारहाणीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो व्हायरल केला. इतकंच नाही तर आरोपी विद्यार्थ्यांनी शिखरचा फोन देखील तोडला. तसंच मुकेश यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनाही धमकावण्यात आले.
मुकेश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आयुष यादव, जाह्नवी मिश्रा, मिलय बॅनर्जी, विवेक सिंग आणि आर्यमन शुक्ला या 5 विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अॅमिटी युनिव्हर्सिटीने या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.