जाहिरात

Ankita Bhandari Story : VIP मंडळींना 'सर्व्हिस' देण्यास नकार दिला, ठार मारून कालव्यात फेकून दिले

उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यातील डोभ-श्रीकोट गावची रहिवासी असलेल्या अंकिता भंडारी ऑगस्ट 2002 मध्ये यमकेश्वर येथील वनतारा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट नोकरीवर रुजू झाली होती.  

Ankita Bhandari Story :  VIP मंडळींना 'सर्व्हिस' देण्यास नकार दिला, ठार मारून कालव्यात फेकून दिले
नवी दिल्ली:

18 सप्टेंबर 2022 रोजी उत्तराखंडमधील एका दुर्गम पण निसर्गरम्य ठिकाणी उभारलेल्या रिसॉर्टमधील 19 वर्षीय रिसेप्शनिस्ट बेपत्ता झाल्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात झाली होती. सुरुवातीला हे प्रकरण साधंसोपं वाटत होतं.  मात्र, काही दिवसांतच या प्रकरणाने गंभीर वळण घेतले. या तरुणीचा मृतदेह ऋषिकेशजवळील एका कालव्यात सापडला. या प्रकरणात ही तरुणी ज्या रिसॉर्टमध्ये कामाला होती त्या रिसॉर्टचा मालक व इतर दोन जणांना अटक करण्यात आली. ज्यानंतर या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली.  या घटनेवरून उत्तराखंडच्या राजकारणातही मोठी पडसाद उमटले होते. तपास जसजसा पुढे सरकत गेला तसा या प्रकरणातील आरोपी आणि त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दलची धक्कादायक माहिती समोर येत गेली.

उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यातील डोभ-श्रीकोट गावची रहिवासी असलेल्या अंकिता भंडारी ऑगस्ट 2002 मध्ये यमकेश्वर येथील वनतारा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट नोकरीवर रुजू झाली होती.  नोकरीला महिना पूर्ण होण्याआधीच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 सप्टेंबरच्या रात्री अंकिता आणि रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य (पुलकित हा भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा मुलगा आहे), रिसॉर्टमधील दोन कर्मचारी सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांच्यात वाद झाला. या वादानंतर अंकिताचे अपहरण करण्यात आले होते, यानंतर तिला एका कालव्यात फेकून देण्यात आले.  या सगळ्या प्रकरानंतर पुलकित आणि त्याचे साथीदार रिसॉर्टवर परत आले आणि त्यांनी अंकिता बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.  

अंकिता बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली, सुरूवातीला नीट माहिती मिळत नसल्याने तपासाला निश्चित दिशा सापडत नव्हती.  ज्या भागात हा रिसॉर्ट आहे ते निम-ग्रामीण भागात असून ते नियमित पोलिसांच्या कार्यक्षेत्राबाहेर होते. यामुळे इथला तपास "पटवारी" यांच्यावर आली होती. तपासासाठी पोलिसांना जे अधिकार असतात ते पटवाऱ्यांना नसतात. ज्यामुळे सुरुवातीला या प्रकरणाच्या तपासात अक्षम्य दिरंगाई झाली होती. अंकिताच्या कुटुंबियांनी तपासाबद्दल नापसंती दर्शवली होती, यानंतर लोकांनीही हा मुद्दा उचलून धरण्यास सुरुवात केली. नागरिकांचा वाढता रोष पाहून हे प्रकरण नियमित पोलिसांकडे सोपवण्यात आले.  

राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) अशोक कुमार यांनी कबूल केले की, पोलिसांनी तत्काळ कारवाई न केल्याने तपासातील सुरुवातीचा अमूल्य वेळ वाया गेला.  "ज्या भागात वनतारा रिसॉर्ट आहे, तो भाग पोलिसांच्या हद्दीत येत नाही.  अशा भागात पटवारी (महसूल अधिकारी) हे एफआयआर दाखल करून घेऊ शकतात.  रिसॉर्ट मालकानेच अंकिता बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती ज्या आधारे FIR नोंदवण्यात आली होती.  

अंकिता बेपत्ता झाल्याची माहिती सगळ्यात आधी तिचा मित्र पुष्पला मिळाली होती. त्याने सांगितले की, 18 सप्टेंबरच्या रात्री अंकिताने त्याला फोन केला होता. ती त्याला सांगत होती की रिसॉर्टवाले तिच्यावर व्हीआयपींना खास 'सर्व्हिस' देण्यासाठी दबाव टाकत होते. हीच बाब अंकिताच्या हत्येसाठी कारणीभूत ठरल्याचे नंतर तपासातून उघडकीस आले.  पुष्प याने सांगितले की अंकितासोबतचा हे त्याचे शेवटचे बोलणे होते, त्यानंतर अंकिताचा फोन बंद झाला. चिंतेत पडलेल्या पुष्प याने रिसॉर्टचा माल पुलकित आर्यलाच फोन करण्याचा प्रयत्न केला होता. पुलकितने त्याला सांगितलं की अंकिता आराम करते आहे. दुसऱ्या दिवसापासून पुलकितचाही फोन बंद झाला होता. रिसॉर्टवर पुष्पने फोन केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली होती.  हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर पुष्पला अंकितासोबत काहीतरी भयंकर घडल्याचा संशय यायला लागला होता. त्याने पोलिसांशी संपर्क साधून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. 

अंकिता बेपत्ता झाल्याच्या सहा दिवसांनी, 24 सप्टेंबर रोजी तिचा मृतदेह चीला कालव्यातून बाहेर काढण्यात आला. एम्स ऋषिकेश इथे शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये तिचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र तिच्या शरीरावर अनेक जखमाही असल्याचे दिसून आले. अंकिताचा मृत्यू होण्याआधी तिला मारहाण झाली होती हे यातून दिसून आले. तिचा व्हिसेराही तपासणीसाठी पाठवण्यात आला, यातून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे निष्पन्न झाले.  

अंकिताचा खून झाल्याचे कळाल्यानंतर स्थानिक जाम संतापले होते. त्यांनी आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीवरच हल्ला चढवला होता. स्थानिकांनी रिसॉर्टचीही तोडफोड केली. पुलकित आर्य हा भाजप नेत्याचा मुलगा असल्याने त्याला वाचवण्यात येत असल्याचा आरोप केला जाऊ लागला. दरम्यान प्रशासनाने वनतारा रिसॉर्ट हे बेकायदेशीर असल्याचे सांगत एका रात्रीत जमीनदोस्त केले.  

पुलकित आर्यचे वडील विनोद आर्य हे उत्तराखंडमधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यांनी पुलकितला सातत्याने पाठिशी घालण्याचे काम केले. माझा मुलगा साधा आहे, तो असलं काही करणार नाही असं ते सतत सांगत होते.  याच विनोद आर्य यांच्यावर त्यांच्या ड्रायव्हरने शारीरिक छळ आणि अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता.  वाढत्या दबावामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी रेणुका देवी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवला. 

अंकिताच्या आईने आरोप केला होता की त्यांना फसवून अंकिताच्या अंत्यसंस्कारापासून दूर ठेवण्यात आले. या सगळ्या प्रकरणात पुष्प आणि पुलकित यांच्यात फोनवरून झालेले संभाषण हा महत्त्वाचा पुरावा ठरला. पुलकितला वाटत होतं की अंकिताचा मृतदेह कधीच सापडणार नाही. अंकिता आणि पुष्प यांच्यात वरचेवर बोलणं होत असल्याने सगळा संशय पुष्पवर जाईल.  पोलिसांनी सदर प्रकरणाच्या तपासादरम्यान रिसॉर्टमधील कर्मचारी, डिजिटल फॉरेन्सिक तज्ञ आणि अंकिताच्या मित्रांसह 100 हून अधिक लोकांची चौकशी केली होती. यातील 47 जणांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी 90 दिवसांच्या आत 500 पानांचे दोषारोपपत्र सादर केले होते. सरकारी पक्षाच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान सांगितले की अंकितावर शारिरीक संबंधांसाठी आणि व्हीआयपींना 'सर्व्हिस' देण्यासाठी दबाव टाकला जात होता. चॅट्स, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि साक्षीदारांच्या जबाबातून या दाव्याला पुष्टी मिळाली. 30 मे रोजी या प्रकरणात पुलकित आर्य, सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांना दोषी ठरवण्यात आले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com