सुरज कसबे, प्रतिनिधी:
Navi Mumbai Cyber Fraud: शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली सव्वा दोन कोटींची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा नवी मुंबई सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सायबर टोळीचा पर्दाफाश
अटक करण्यात आलेल्यांपैकी दोन आरोपींनी यापूर्वी बँकॉक आणि म्यानमारमधील कुप्रसिद्ध सायबर फसवणूक कॉल सेंटर्समध्ये काम केले आहे. एका प्लेसमेंट आणि इंटर्नशिप देणाऱ्या कंपनीच्या मालकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवण्यात आले होते. सायबर भामट्यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांच्याकडून २,०९,३०,५३७ रुपये उकळले.
Ashok Kharat: खरातला कोण-कोण फोन करत होते? एक नाव तर धक्कादायक, दमानियांकडून कॉल डिटेल्स जाहीर
परतावा न मिळाल्याने फर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तपासादरम्यान पोलिसांना सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एका संशयास्पद खात्याची माहिती मिळाली, जे आर्शिल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नवी मुंबईत होते. तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी तुर्भे परिसरातून सुशील भगवान जुवाटकर याला ताब्यात घेतले. त्याने हे खाते आपले साथीदार पंकज कपूर आणि निश्चल बरेयली यांच्या सांगण्यावरून उघडल्याची कबुली दिली.
बँकॉक, म्यानमारमध्ये घेतलेलं प्रशिक्षण!
तपासात निष्पन्न झाले की, आरोपी पंकज कपूर आणि निश्चल बरेयली हे बँकॉक व म्यानमारमध्ये सायबर कॉल सेंटर चालवण्याचा अनुभव घेऊन आले होते आणि नवी मुंबईत नवीन कॉल सेंटर सुरू करण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून ०६ मोबाईल फोन व ०२ लॅपटॉप, ०३ पासपोर्ट आणि ०३ पॉसमशीन,२४ विविध बँकांचे खाते उघडण्याचे किट्स ,१२ बनावट शिक्के आणि ०२ हार्डडिस्क असा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुशील भगवान जुवाटकर, पंकज राज कपूर आणि निश्चल टंकबीर बरेयली या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखवत फिर्यादीचे ६२ लाख रुपये विविध बँक खात्यांमध्ये होल्ड करण्यात यश मिळवले असून, पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे व त्यांचे पथक करत आहेत.