बिहारमध्ये पौर्णिया (Bihar Pournia massacre) जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. येथे चेटकीणीच्या संशयातून एकाच कुटुंबातील पाच जणांना जबर मारणार करण्यात आली. ते इथवर थांबले नाहीत तर त्यांनी पाचही सदस्यांना जिवंत (Family burned alive) जाळण्यात आलं. ही भयंकर घटना मुफ्फसल पोलीस ठाणे हद्दीतील टेटगामा गावात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील रामदेव उराव याच्या मुलाचा या अघोरी प्रकारादरम्यान मृत्यू झाला होता आणि दुसऱ्या मुलाची तब्येत बिघडली. यानंतर गावकऱ्यांनी मुलाच्या मृत्यूसाठी गावातील बाबुलाल यांच्या पत्नीला चेटकीण असल्याचं मानत कुटुंबावर निशाणा साधला.
बाबुलाल उराव (पती), सीता देवा (पत्नी), मनजीत उराव (मुलगा), राणी देवी (सून) आणि मो कातो (आई) यांना गावकऱ्यांनी जबर मारहाण केली आणि त्यानंतर पाचही जणांना जिवंत जाळलं. हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. गावातील अनेकजण आपलं घर सोडून दुसरीकडे निघून गेले आहेत.
नक्की वाचा - Mumbai Police : मोबाइल चोरीचा आरोप, शेफची पोलीस लॉकअपमध्ये आत्महत्या; अनेक सवाल अनुत्तरित...
पोलिसांनी या प्रकरणात एक आरोपी नकुल कुमार याला अटक केली आहे. याच्यावर पाच जणांचा जिवंत जाळणं आणि गर्दीला चिथावल्याचा आरोप आहे. या घटनेत बचावलेला एकमेव व्यक्ती ललित कुमारने सांगितलं की, त्याच्या संपूर्ण कुटुंबाला काळी जादू केल्याच्या संशयातून जाळण्यात आलं. याशिवाय हत्या केल्यानंतर मृतदेह तलावात फेकून देण्यात आले.
हत्याकांडामागील नेमकं कारण काय आहे?
टेटगावात रामदेव उरावचं कुटुंबीय राहतं. रामदेव यांचा मुलगा आजारी होता. कुटुंबाने तंत्र-मंत्राचा आधार घेतला. मात्र त्याची तब्येत अधिक खालावली आणि यातच त्याचा मृत्यू झाला. रामदेवला गावातील बाबूलाल उराव आणि त्याच्या कुटुंबीयांनी काळी जादू केल्याचा संशय होता. त्याने उराव कुटुंबाला मुलाच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले. त्यांनी काळी जादू करून मुलाला मारल्याचा संशय व्यक्त केला. बाबूलाल याची बायको चेटकीण असल्याचं मानत त्याने गावातील कुटुंबाला एकत्र केलं आणि कुटुंबाला जिवंत जाळलं.
रात्री एक वाजता बोलावली पंचायत...
रविवारी रात्री गावात पंचायत बोलावण्यात आली. साधारण तीन गावातील 300 लोक या पंचायतीत सामील झाले. दोन ते तीन तास पंचायतीची बैठक सुरू होती. काही पंचांनी बाबूलाल आणि त्याच्या कुटुंबीयांना जबाबदार धरलं. यानंतर रात्री साधारण एक वाजता कुटुंबातील पाच सदस्यांना घरापासून 50 फूट अंतरात घेऊन जाण्यात आलं. येथे त्यांना जबर मारहाण केली. रश्शीने बांधण्यात आलं. यानंतर त्यांन जिवंत जाळलं. या घटनेवेळी तेथे शेकडो गावकरी उपस्थित होते. पीडित कुटुंब जीवाची भीक मागत होते. मात्र कोणीच त्यांच्या मदतीला आलं नाही. ही गर्दी त्यांना जिवंत जळताना पाहत होती.