नागरिकांनीही प्रयत्न केला, पण सर्व व्यर्थ; भुशी डॅमसारखी परिस्थिती उद्भवली तर कसा कराल बचाव?

पावसाळा सुरू झाला की पर्यटन क्षेत्रातून अशा घटना वारंवार समोर येतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

लोणावळ्यातील भुशी डॅम (Bhushi Dam in Lonavala) परिसरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. भुशी डॅम परिसरात पावसाचा आनंद घेण्यासाठी गेलेलं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने एकाच कुटुंबातील पाच जणं वाहून गेल्याच्या घटनेचा एक व्हिडिओही (Shocking Video) समोर आला आहे. दरम्यान काळमवाडीच्या दूधगंगा नदीत दोघेजण बुडाल्याची घटना घडली आहे. बुडालेले दोघेजण निपाणीतील आहेत. गणेश कदम (वय 18) आणि प्रतीक पाटील (वय 22) अशी त्यांची नावं आहेत.

त्याशिवाय पुणे ग्रामीण हद्दीतील ताम्हिणी घाटात वन प्लस वॅलीतून उडी मारलेल्या एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. पावसाळा सुरू झाला की पर्यटन क्षेत्रातून अशा घटना वारंवार समोर येतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. 


पावसाळ्यात पर्यटनासाठी जाताना काय काळजी घ्याल?

  • फिरण्यासाठी एखाद्या ठिकाणाची निवड केल्यानंतर आधी त्याबद्दल अधिकची माहिती घ्या. जर डोंगर, नदी अशा ठिकाणी जात असाल तर तेथील काही धोकादायक ठिकाणांविषयी आधीच माहिती घ्यावी. 
  • निसर्गसंपन्न ठिकाणं आणि मॉल यामध्ये अंतर असतं. निसर्गाच्या सानिध्यात काही दुर्घटना होऊ शकतात. त्यामुळे अधिक सजग राहणं आवश्यक आहे. 
  • फोटो किंवा रिल्सच्या नादात नको ते धाडस करू नये. 
  • भुशी डॅम येथे झालेल्या अपघातात अचानक पाण्याचा प्रवाह वाढला होता. अशावेळी अधिक सावध राहणे आवश्यक आहे आणि मजामस्तीमध्ये भान हरपून जाऊ नये.
  • नदी, धरण किंवा धबधबा अशा ठिकाणी येऊन व्यसन करणं महागात पडू शकतं. अनेकदा गड-किल्ल्यावरही अशा घटना घडताना दिसतात. 
  • शक्य असेल तर स्थानिक गाईडला सोबत घेऊन पर्यटनस्थळ फिरा. त्यांना धोकादायक ठिकाणांची माहिती असते. त्यामुळे स्थानिक तुम्हाला योग्य पद्धतीने गाईड करू शकतात. 
  • धोकादायक ठिकाणी एकटं जाणं टाळावं, पाच किंवा त्याहून अधिक जणांचा ग्रुप घेऊन फिरणं सुरक्षित. 
  • बॅगेत पाणी, खाण्याचे पदार्थ, एक कपड्यांचा जोड सोबत ठेवावा. काही अघटित घडलं तर तुमच्याकडे बॅकअप असेल. 
  • पावसाळ्यात महाराष्ट्रातील अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. अशावेळी आगाऊ माहिती घेऊन पर्यटनाचं ठिकाण प्लान करावं.