अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर:
Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरातून आई-वडिलांच्या कुशीतून पळवण्यात आलेल्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा अवघ्या २० तासांत शोध लावण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आले. या प्रकरणात तेलंगणातील महिलांच्या टोळीने मुलाची साडेतीन लाख रुपयांत विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने पाच महिलांना अटक करून मुलाला सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले.
तीन वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण
समोर आलेल्या माहितीनुसार, अटकेतील आरोपीचे नाव ऐलक्का बुद्दे राणी पसनोटी , संगीता पानंगणती सातक्का चंद्रया करेरे व लावण्या कुमारस्वामी कोणा हे सर्व तेलंगणा राज्यातील मंचिर्याल येथील रहिवासी आहे अन्य दोन संशयितांच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे. रात्री रेल्वे स्टेशन परिसरात झोपलेल्या कुटुंबातील तीन वर्षांच्या मुलाचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते.
पोलिसांकडून २० तासात शोध
सकाळी तक्रार दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांची सात पथके तपासासाठी रवाना झाली. पोलिसांनी परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान एका चारचाकी वाहनातून मुलाला मंचेरियल येथे नेल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकून पाचही महिलांना अटक करण्यात आली.
दरम्यान, आरोपी महिलांनी दोन पुरुष साथीदारांसह मुलाच्या पालकांवर रात्रभर पाळत ठेवून मध्यरात्री अपहरण केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर मुलाची ३ लाख ५० हजार रुपयांत विक्री करण्यात आली होती.या टोळीने यापूर्वी आणखी किती मुलांचे अपहरण केले आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Nashik Crime: आणखी 3 मुली बेपत्ता! नाशिकमध्ये अपहरण सत्र थांबेना, पालकांमध्ये भितीचे वातावरण