छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात काल दरोड प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीचा एन्काऊंटर केला. अमोल खोतकर असे त्याचं नाव आहे. पण छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यापासून शहरात आतापर्यंत पाच कुख्यात गुन्हेगार आणि अतिरेक्यांना पोलिसांनी एन्काऊंटर करून कंठस्नान घातले आहेत. कशाप्रकारे आणि कुठल्या कुठल्या घटनेत हे एन्काऊंटर झाले आहेत? जाणून घ्या सविस्तर..
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहिली घटना: 27 मे 1998 रोजी मध्यरात्री शहानूरमियाँ दर्गा परिसरातील नाल्यात दीपक भोंड या दरोडेखोराचे एन्काउंटर झाले होते. तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त सदानंद वायसे पाटील यांनी हे एन्काउंटर केले होते.
दुसरी घटना: 2002 मध्ये राजुरा शिवारात गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक जेम्स अंबिलढगे यांनी दरोडेखोर पोपट काळे याचे एन्काउंटर केले होते.
तिसरी घटना: 14 मे 2004 रोजी 3 आंबेडकरनगरमध्ये तत्कालीन उपनिरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी कुख्यात विलास सुरडकर याचे एन्काउंटर केले होते. घराच्या छतावरून पळताना माळाळे यांनी त्याला गोळ्या घातल्या होत्या.
चौथी घटना: 2012 मध्ये एटीएसचे तत्कालीन प्रमुख नवीनचंद्र रेड्डी, पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांनी हिमायत बागेजवळ अतिरेकी अझर कुरेशीचे एन्काउंटर केले होते.
पाचवी घटना: 27 मे 2025 च्या मध्यरात्री वाळुज येथील दरोडेखोरीतील आरोपी अमोल खोतकर याचा वाळूज परिसरात पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये दरोडयातील आरोपी अमोल खोतकरच्या एन्कांऊटर प्रकरणी त्याची बहीण आणि वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. पोलिसांनी सुपारी घेऊन त्याचा इन्काऊंटर केला. माझ्या भावाचा हॉटेलचा आणि ट्रक चालवण्याचा व्यवसाय होता. त्याच्यावर अन्याय झालेला आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत डेड बॉडी ताब्यात घेणार नाही असे अमोल खोतकरच्या आई-वडिलांनी म्हटले आहे.