Shocking News : एका अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. किरकोळ वादातून एका पतीने आपल्या विभक्त झालेल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर मृतदेहासोबत सेल्फी घेऊन तो फोटो आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला. 'तिने माझा विश्वासघात केला,' असा दावाही त्याने स्टेटसमध्ये केला होता, ज्यामुळे संपूर्ण तामिळनाडूमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
काय आहे प्रकरण?
ही क्रूर घटना रविवारी दुपारी घडली. श्रीप्रिया नामक महिला तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथील एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. ती तिचा पती बालामुरुगन याच्यापासून विभक्त राहत होती. बालामुरुगन तिच्याशी भेट घेण्यासाठी एका महिला वसतिगृहात आला होता.
बालामुरुगनने आपल्या कपड्यांमध्ये धारदार विळा लपवून आणला होता, अशी माहिती तपास करणाऱ्यांनी दिली आहे. त्यांची भेट झाल्यानंतर लवकरच त्यांच्यात जोरदार भांडण सुरू झाले. या भांडणादरम्यान बालामुरुगनने अचानक विळा बाहेर काढला आणि वसतिगृहामध्येच श्रीप्रियावर वार करून तिची हत्या केली.
( नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमध्ये सत्तेच्या बळावर गुन्हेगारी; तरुणीवर अत्याचार करणारा राजकीय कार्यकर्ता अखेर जेरबंद )
व्हॉट्सअपवर ठेवले स्टेटस
या हल्ल्यामुळे वसतिगृहातील रहिवासी घाबरून बाहेर पळाले. मात्र, आरोपी बालामुरुगन घटनास्थळीच थांबून राहिला आणि त्याने पोलिसांची वाट पाहिली. पोलिसांनी सांगितले की, त्याने हत्येनंतर श्रीप्रियाच्या मृतदेहासोबत सेल्फी काढला आणि तो 'विश्वासघाताचा' दावा करत व्हॉट्सॲप स्टेटसवर अपलोड केला. पोलिस घटनास्थळी दाखल होताच, त्याला ताबडतोब अटक करण्यात आली असून हत्येसाठी वापरलेले शस्त्रही हस्तगत करण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात मिळालेल्या बालामुरुगनला संशय होता की त्याची पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंधात होती, याच संशयातून त्याने हे भयंकर कृत्य केल्याचे स्पष्ट होत आहे.
या क्रूर हत्येमुळे तामिळनाडूत महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकीय चर्चा तीव्र झाली आहे. विरोधी पक्षांनी सत्ताधारी द्रमुक (DMK) सरकारवर कायदा आणि सुव्यवस्थेचे अपयश असल्याचा आणि महिलांचे संरक्षण करण्यास असमर्थ ठरल्याचा आरोप केला आहे. राज्यात वाढत्या क्रूर गुन्हेगारी आणि लैंगिक गुन्ह्यांच्या घटनांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
दुसरीकडे, द्रमुक सरकारने आणि राज्य पोलिसांनी मात्र या घटनांना वैयक्तिक शत्रुत्वामुळे घडलेले तुरळक गुन्हे असल्याचं म्हंटलं आहे. प्रत्येक गुन्ह्यात तातडीने कारवाई केली जात आहे, जेणेकरून जलद न्याय मिळेल आणि दोषींना कठोर शिक्षा होईल, यावर DMK नं जोर दिलाय.