Dombivli News : डोंबिवली शहरात घरांचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीयांची मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संरक्षण खात्याच्या (Defence) अखत्यारीत असलेल्या जमिनीवर अनधिकृत बांधकामे करून, ती स्वस्त दरात देण्याचे आमिष दाखवत शेकडो नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
डोंबिवलीजवळील खोणी धामटण या भागात 'साई माऊली कन्स्ट्रक्शन' या नावाने आरोपींनी आपला व्यवसाय थाटला होता. मनोज धुमाळ आणि सचिन सुर्वे या आरोपींनी चक्क संरक्षण खात्याच्या मालकीच्या जागेवर 3 खोल्यांचे अनधिकृत बांधकाम केले.
या खोल्या ग्राहकांना 'सॅम्पल हाऊस' म्हणून दाखवण्यात येत असत. स्वस्त दरात घर मिळत असल्याचे पाहून अनेक गरजू नागरिकांनी या फसव्या आमिषाला बळी पडत लाखो रुपये या माफियांना दिले.
( नक्की वाचा : Nagpur News : जेवणात विभूती आणि महाराजांकडे राहण्याची सक्ती, नागपूरच्या इंजिनियर तरुणीच्या मृत्यूचे कारण उघड! )
250 नागरिकांना फटका
प्राथमिक माहितीनुसार, या आरोपींनी जवळपास 200 ते 250 नागरिकांकडून घरांच्या नावाखाली पैसे उकळले आहेत. कुणाकडून 2 लाख तर कुणाकडून 4 लाख रुपये घेऊन हे आरोपी फरार झाले होते. सर्वसामान्यांच्या कष्टाची ही रक्कम घेऊन त्यांनी कोट्यवधींची माया जमा केली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर सापळा रचून पोलिसांनी या दोन्ही चाळमाफियांना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले असता, त्यांना 19 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्या मते, या मोठ्या रॅकेटमध्ये आणखी 2 ते 3 लोकांचा सहभाग असू शकतो, ज्यांचा शोध सध्या सुरू आहे. आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची आणि बनावट कागदपत्रांची कसून चौकशी केली जात आहे. या कारवाईमुळे फसवणूक झालेल्या नागरिकांमध्ये काही प्रमाणात समाधानाचे वातावरण असले, तरी त्यांचे पैसे परत मिळणार का, हा प्रश्न कायम आहे.
( नक्की वाचा : Dombivli News: नवऱ्यानं आधी घरातील सिलेंडर लांबवला, आता पत्नीला सांगतोय ‘धंदा कर'; डोंबिवलीतील संतापजनक प्रकार )
नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन
सरकारी किंवा संरक्षण खात्याच्या जमिनीवर कोणतेही बांधकाम करणे बेकायदेशीर आहे. अशा ठिकाणी स्वस्त घरांची स्वप्ने दाखवणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. घर घेताना रेरा (RERA) नोंदणी आणि जमिनीच्या मालकी हक्काची कागदपत्रे तपासूनच व्यवहार करावा, जेणेकरून फसवणूक टाळता येईल.