Dombivli News : डोंबिवलीतून एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. येथे नववधूच्या आई-वडिलांनी तिच्या हळदीच्या दिवशी तिला गायब केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या नववधूची आई-वडिलही गायब झाले आहेत. या प्रकरणी वराने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ओंकार बनसोडे आणि शिवानी किंगरे अशी त्यांची नावं आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, या ओंकार-शिवानीचे गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपूर्वी शिवानीला एक स्थळ पाहण्यासाठी आलं होतं. शिवानीवर तिच्या कुटुंबाकडून लग्नासाठी दबाव आणला जात होता. ही परिस्थिती पाहता काही दिवसांपूर्वी त्यांनी कोर्टात जाऊन लग्नही केलं होतं. दोघांनी काही दिवसांपूर्वी कल्याण न्यायालयात विवाह नोंदणी करून लग्न केलं होते. यानंतर शिवानीने कुटुंबाला आपण ओंकारसोबत लग्न केल्याचं सांगितलं. यानंतर कुटुंबाचा संताप झाला. ओंकारची जात विचारल्यानंतर ते अधिक चिडल्याचं ओंकारने माध्यमांशी बोलताना सांगितलं. यानंतर ओंकार शिवानीला सोबत घरी घेऊन गेला. तिथे दोन दिवस राहिल्यानंतर शिवानीच्या मामाने फोन करून आपली लग्नास संमती असल्याचं सांगितलं. शिवानीच्या कुटुंबीयांचा सुरुवातीला या विवाहाला विरोध होता. ओंकार हा दलित समाजाचा असल्याने कुटुंबीय नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. तर शिवानी ही उच्च जातीची आहे.
शिवानी अन् कुटुंबीयांचे मोबाइल फोन बंद...
आपल्या मुलीने कोर्टात विवाह केल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवानीच्या मामांनी विवाहाला संमती असल्याचं नाटक केल्याचं ओंकारने केला आहे. विधीवत पद्धतीने तुमचे पुन्हा लग्न लावून देण्याचं आश्वासन देत दोन्ही कुटुंबीयांनी डोंबिवलीतील एका हॉलची पाहणीही केली. हॉलचे आगाऊ पैसे ओंकार याने भरल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर शिवानीच्या कुटुंबीयांनी काही अटींचा उल्लेख करत शिवानीला काही दिवसांसाठी घरी घेऊन गेले. मात्र त्यानंतर शिवानी, तिचे कुटुंबीय आणि त्यांचे मोबाइल फोन अचानक बंद झाले. अनेक ठिकाणी शोध घेऊनही त्यांचा संपर्क न झाल्याने ओंकार यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर मानपाडा पोलीस शिवानी आणि तिच्या कुटुंबीयांचा शोध घेत असून नेमके काय घडले याचा तपास सुरू आहे. पोलीस तपासानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.