मनोज सातवी, प्रतिनिधी
Mira Road Bhayander News : मिरा रोड पूर्वेतील काशिगाव परिसरातल्या नामांकित जे.पी. नॉर्थ गार्डनर सिटी सोसायटीत सार्वजनिक गरबा सुरू असतानाच एका व्यक्तीने अंडी आणि टोमॅटो फेकल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याबाबत संतप्त रहिवाशांनी काशीगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी एस्टेला बिल्डिंगमध्ये राहणारा संशयित मोहसीन खान याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिरा रोड पूर्वेतील काशिगाव परिसरातल्या जे.पी. नॉर्थ गार्डन सिटी या नामांकित सोसायटीतील गरबा महोत्सवात धक्कादायक प्रकार घडला आहे. रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास सोसायटीच्या मैदानावर पारंपरिक गरबा रंगात आला असतानाच एका व्यक्तीने वरच्या मजल्यावरून अंडे फेकल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.
याबाबत संतप्त रहिवाशांनी काशीगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी एस्टेला बिल्डिंगमध्ये राहणारा संशयित मोहसीन खान याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री जवळपास 10.30 वाजता गरबा सुरू असताना एस्टेला बिल्डिंगमधील एक रहिवासी हातात मोबाईल घेऊन मैदानात आला. त्याने कार्यक्रमातील डेसिबल लेव्हल तपासले तसेच गरबा खेळणाऱ्या लोकांचे व्हिडिओ काढून ते पोलिसांना दाखवत होता. यापूर्वी देखील त्याने अनेक वेळा कार्यक्रम थांबवण्यासाठी पोलिसांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर रात्री 10.50 वाजताच्या सुमारास तोच व्यक्ती 16 व्या मजल्यावरून काहीतरी खाली फेकल्याचे नागरिकांनी पाहिले. काही वेळातच दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या जवळ फुटलेले अंडे आढळल्याने संतापाचा उद्रेक झाला.
नक्की वाचा - Virar News : 'एकही हिंदू मुलगी सोडू नका', गरब्यात येणाऱ्या तरुणींबाबत आक्षेपार्ह चॅट व्हायरल
नागरिक संतप्त, पोलीस बंदोबस्त वाढवला
या प्रकारामुळे परिसरातील नागरिक आणि सोसायटीतील रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली. लगेचच संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्रकरण गंभीर होत असल्याचे लक्षात घेऊन काशीगाव पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला असून जे.पी. नॉर्थ गार्डन सिटी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी भारतीय दंड संहिता 2023 (BNS) कलम 300 अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, ही घटना केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उत्साहावर पाणी फिरवणारी नसून परिसरातील शांतता भंग करणारी ठरली आहे. त्यामुळे याबाबत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.