मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणा याला अमेरिकेतून भारतात आणले गेले. त्याच्यावर आता इथं खटला चालवला जाईल. भारतात आणल्यानंतर त्याला दिल्लीच्या कोर्टाने 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली होती. ही कोठडी सुनावताना कोर्टाने आपल्या आदेशात काही गोष्टी अधोरेखीत केल्या होत्या. 12 पानाच्या आदेशांची ही प्रत NDTV मराठीच्या हाती लागली आहे. त्यात काही महत्वाच्या गोष्टींकडे कोर्टाने लक्ष वेधले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तहव्वुर राणाच्या 18 दिवसांच्या रिमांडच्या आदेशाची माहिती NDTV मराठीच्या हाती लागली आहे. 12 पानांच्या आदेशात कोर्टाने म्हटले की हे षडयंत्र भारताच्या सीमेपलीकडे रचले गेले. त्याचे धागेदोरे हे परदेशातही आहेत. कोर्टानं आपल्या आदेशात म्हटले आहे की, हे एक योजनापूर्वक रचलेले षडयंत्र आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीसह देशातील अनेक मोठ्या शहरांना लक्ष्य करण्यात आले होते.
कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांवरून असे दिसून येते की, या कटाची व्याप्ती भारताच्या सीमेपलीकडे आहे. कटानुसार भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करण्याचा डाव होता असंही कोर्टाने म्हटले आहे. आरोपीने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या रेकीशी संबंधित पुराव्यांसह त्याला सामोरे जाणे आवश्यक आहे. साक्षीदार, फॉरेन्सिक आणि कागदोपत्री पुराव्यांसह आरोपींना समोरासमोर आणणे आवश्यक आहे. या कटाच्या मुळाशी जाण्यासाठी दीर्घ पोलिस चौकशी आवश्यक असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
या कटाचा सगळ्या गोष्टी उलगडण्यासाठी आणि वस्तुस्थितीच्या मुळाशी जाण्यासाठी सखोल तपास आवश्यक आहे. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. त्या बाबतचे पुरावे रेकॉर्डवर असल्याचे कोर्टाने म्हटले. या प्रकरणातील आरोप राष्ट्राच्या सुरक्षिततेशी संबंधित आहेत. त्यामुळे तपास यंत्रणेला पूर्ण संधी दिली पाहिजे. जेणेकरून ते कोर्टासमोर संपूर्ण चित्र पुराव्यासह स्पष्ट करू शकतील. संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्षपणे चौकशी करण्याची संधी तपास यंत्रणेला दिली पाहिजे. जेणे करून संपूर्ण सत्य न्यायालयासमोर मांडता येईल, असं शेवटी कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.
तहव्वुर राणावर भारतावर हल्ला करणाऱ्यांना मदत करण्याचा आणि हल्ल्याची योजना बनवण्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर अन्य 166 जणांचा मृत्यू झाला होता. तहव्वुर हा अमेरिकी यंत्रणांच्या हाती लागला होता. तिथे त्याच्यावर खटला ही चालला त्याला शिक्षा ही झाली. आता त्याचे प्रत्यर्पण करण्यात आले आहे. त्यानुसार आता भारतात त्याच्यावर खटला चालवला जात आहे.