Triple Talaq : तीन तलाकच्या विरोधात कडक कायदे होऊनही समाजातील काही क्रूर प्रथांमुळे एका विवाहितेचा बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्यासोबत झालेल्या वादानंतर तिला घराबाहेर काढण्यात आले आणि पुन्हा घरात प्रवेश हवा असेल तर एका अत्यंत अमानवीय अटीचा सामना करावा लागला. या अटीने केवळ त्या महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त केले नाही, तर शेवटी तिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ही घटना ऐकून कोणाच्याही अंगावर शहारे येतील अशी भीषणता या प्रकरणात आहे.
काय आहे प्रकरण?
ही हृदयद्रावक घटना बिहारमधील बेतिया जिल्ह्यातील मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मनसा टोला (वॉर्ड नंबर 32) येथे घडली आहे. रेहाना खातून नावाच्या 26 वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला असून, तिच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. रेहानाचे लग्न 2 सप्टेंबर 2019 रोजी मसकुर उर्फ लाडले याच्याशी झाले होते. त्यांना रेयान आणि आयत ही दोन लहान मुले देखील आहेत. साधारण 10 दिवसांपूर्वी पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि पतीने रागाच्या भरात तिला तलाक दिला.
( नक्की वाचा : Pune News आधी चारित्र्यावर शिंतोडे, मग DNA चाचणी आणि अखेर अंगावर काटा आणणारा निकाल; 'या' प्रकरणाने सर्व हादरले )
तलाक झाल्यानंतर रेहानाला पुन्हा सासरी नांदायला यायचे असेल, तर सासरच्या लोकांनी तिच्यासमोर हलालाची अट ठेवली होती. धक्कादायक बाब म्हणजे, तिला तिच्या स्वतःच्या दिरासोबत निकाह करण्यास भाग पाडले जात होते. रेहानाने या अमानवीय प्रथेला आणि देवासोबत निकाह करण्याला कडाडून विरोध केला होता. याच विरोधामुळे तिचा छळ करण्यात आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला असावा, असा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
गुरुवारी सकाळी रेहानाची प्रकृती बिघडल्याचे सांगत तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत्यूची बातमी समजताच सासरचे लोक तिथून पळ काढण्याच्या तयारीत होते, पण पोलिसांनी वेळेत पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. सध्या सासरचे सर्व सदस्य फरार आहेत.
( नक्की वाचा : Nashik News: खळबळजनक! नाशिकमध्ये मुलं चोरणारी टोळी सक्रिय? 4 महिलांनाही पकडलं, मग काय झालं?)
रेहानाचे वडील मोहम्मद साबिर हसन, जे हरियाणातील फरीदाबादचे रहिवासी आहेत, त्यांनी या प्रकरणी न्यायाची मागणी केली आहे. मुफस्सिल पोलीस ठाण्याचे प्रमुख सम्राट सिंह यांनी सांगितले की, मृतदेह पोस्टल मार्टेमसाठी पाठवण्यात आला असून लेखी तक्रार प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.