- जळगाव जिल्ह्यातील देऊळगाव कापूस वाडी भागात एका 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे
- अत्याचार करताना आरोपींनी व्हिडीओ तयार केला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला
- या घटनेचा तपास करत पोलीसांनी 15 पैकी 14 आरोपींना अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे
मंगेश जोशी
महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. राज्यात कुठे ना कुठे महिलांच्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशाच जळगावमध्ये एक हादरवणारी घटना समोर आली आहे. इथं एका 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. शिवाय अत्याचार करताना व्हिडीओ ही बनवण्यात आला. हा अत्याचार तिच्या मित्रा समोरच करण्यात आला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. महिलेला हे समजल्यानंतर तिने पोलीसात धाव घेतले. या प्रकरणी 15 आरोपीं पैकी 14 जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना 2 जून रोजी एका जगंलात घडली होती.
जामनेर तालुक्यातील देऊळगाव कापूस वाडी या ठिकाणी ही घटना घडली आहे. या भागात असलेल्या जंगलात एक 40 वर्षीय महिला आपल्या मित्रा सोबत बसली होती. त्याच वेळी तिथे 15 जणांचे टोळके आले. त्यांनी या महिलेची छेड काढली. त्यातील दोन जणांनी या महिलेवर तिच्या मित्रा समोरच अत्याचार केला. ज्या वेळी ते अत्याचार करत होते त्यावेळी तिथे असल्या अन्य नराधमांनी त्याचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर ते तिथून निघून गेले. झालेला प्रकार या महिलेने कोणालाही सांगितला नाही.
नक्की वाचा - Siya Goyal: सोनम सुटली! सिया गोयल ही जामीनावर सुटणार? कोर्टाच्या 'त्या' निकालाने खळबळ
मात्र त्यानंतर हा व्हिडीओ त्या नराधमांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ही बाब त्या महिलेच्या लक्षात आली. तिने तातडीने पोलीसात धाव घेतली. आपल्यासोबत झालेला प्रकार तिने पोलीसांना सांगितला. पोलीसांनी ही तेवढ्याच जलदगतीने सुत्र हलवली. घटनास्थळी भेट दिली. शिवाय फत्तेपूर पोलीस स्टेशनमध्ये 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात पसरली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
घटनेचे गांभिर्य लक्षात घेत पोलीसांनी 15 पैकी 14 जणांना अटक केली आहे. तर एकाचा शोध सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांनी या घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय अशा घटना पूर्वी कोणासोबत ही घडल्या असतील तर त्यांनी पुढे येवून तक्रार करावी असे आवाहन ही केले आहे.