मंगेश जोशी, प्रतिनिधी
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातल्या रेल या गावांमध्ये १२ वर्षीय गणेश नवल पाटील या मुलाचा क्रिकेट खेळताना बॅट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अकस्मात मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांनी गणेशचा दफनविधी करत अंत्यसंस्कार केला होता. मात्र मुलाचा मृत्यू हा अकस्मात नसून घातपात असल्याचा संशय आल्याने वडिलांनी याप्रकरणी पोलिसात धाव घेतली. मात्र पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर गणेश पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश धरणगाव पोलिसांना दिले आहेत.
गणेशचा मृत्यू हा अकस्मात की घातपात?
या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू करण्यात आला असून या तपासासाठी अडीच महिन्यापूर्वी जमिनीत पुरलेला मृत गणेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात शवविच्छेदन अहवालातून गणेशच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गणेशचा मृत्यू हा अकस्मात की घातपात? हे गूढ उलगडेल.
१२ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूचं दु:ख मोठं असतं. त्यातही मुलाच्या मृत्यूच्या अडीच महिन्यानंतर मुलाचा सांगाडा पाहून नवल पाटील यांना अश्रू अनावर झाले.