- बुलडाणा तालुक्यातील कोलवड गावात लग्न समारंभात जुन्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला झाला आहे
- गौरव गजानन जाधववर नितीन सपकाळ आणि मयुरेश दसरकर यांनी चाकूने वार केल्याचा आरोप
- गंभीर जखमी झालेल्या गौरव जाधवचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी अद्याप फरार आहेत
अमोल सराफ
लग्नाच्या आनंदी वातावरणाला अचानक हिंसाचाराचे गालबोट लागल्याची धक्कादायक घटना बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथे घडली. कावड यात्रेदरम्यान झालेल्या जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभातच तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला असून हल्ला करणारे आरोपी फरार आहेत. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्लानंतर लग्न समारंभात एकच गोंधळ उडाला.
गौरव गजानन जाधव हा युवक गावातील एका लग्न समारंभाला उपस्थित होता. लग्नसोहळा पार पडून पंगतीत जेवण सुरू असताना त्याचा गावातील नितीन सपकाळ याच्याशी वाद झाला. काही दिवसांपूर्वी कावड यात्रे दरम्यान दोघांमध्ये वाद झाल्याची पार्श्वभूमी होती. त्याच कारणावरून पुन्हा वाद चिघळल्याचे समोर आले आहे. वाद वाढताच आरोपी नितीन सपकाळ याने त्याच्यासोबत असलेल्या मयुरेश दसरकर याच्याकडील चाकू घेतला. त्यानंतर कसला ही विचार न करता त्याने गौरव जाधव याच्यावर सपासप वार केले. असा आरोप आहे.
या हल्ल्यात गौरव जाधव गंभीर जखमी झाल आहे. हल्ला झाल्यानंतर त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. तिथेच त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेले अरुण सुभाष जाधव यांनाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. तक्रारीनुसार या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बुलढाणा पोलिस करत आहेत. आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
लग्ना वेळी आनंदाचे वातावरण होते. कोणालाही पुढे काय होणार आहे याची कल्पना नव्हती. मुला प्रमाणे मुलीकडचे नातेवाईक ही लग्न गडबडीत होते. सर्वच जण नव वधूवरांना शुभेच्छा देत होते. आनंदाचं वातावरण असतानाच हा प्रकार घडला. त्यामुळे लग्न मंडपात एकच खळबळ उडाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्याचा व्हिडीओ ही सध्या व्हायरल होत आहे. पूर्वीच्या वादातून ही भांडणे झाल्याचं ही स्पष्ट झालं आहे.