विशाल पुजारी, कोल्हापूर:
Kolhapur Double Murder Case: 20 गुंठे जमिनीच्या वादातून भावानेच आपल्या सख्ख्या भावाची आणि वडिलांची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याची भयंकर घटना कोल्हापुरमध्ये घडली आहे. कोल्हापुरच्या हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. शीतल मारुती कुंडले आणि मारुती कुंडले अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत.
दुहेरी हत्याकांडाने कोल्हापूर जिल्हा हादरला
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोल्हापुरात 20 गुंठे जमिनीच्या वादातून भावानेच आपल्या सख्ख्या भावाचा आणि वडिलांचा कुऱ्हाड आणि खोऱ्याने वार करून निर्घृण खून केला आहे. हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव इथं रविवारी रात्री ही घटना घडली. वडील मारुती कुंडले आणि लहान भाऊ शीतल कुंडले अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर संशयित आरोपी संभाजी कुंडले खून करून स्वतः हून हातकणंगले पोलीस ठाण्यात हजर झाला.
हिंगणगाव गावातील मारुती कुंडले यांना संभाजी आणि शीतल अशी दोन मुले आहेत. या कुटुंबात जमिनीच्या वाटपावरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडली ही घटना घडताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. तर खून करणारा संभाजी कुंडले हा सराईत गुन्हेगार असून त्यानं 1999 ते 2000 मध्ये स्वतः च्या पत्नीला राॅकेल ओतून पेटवून मारलं होते. त्यातून तो निर्दोष सुटला असून त्याच्या पत्नीची हत्येत सासूचा हात असल्याचे सिद्ध झाले होते. अशातच आता या क्रुर मुलाने वडील आणि लहान भावाचा खून केल्याने हिंगणगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुलानेच केली बापाची हत्या
दुसरीकडे बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा बस स्थानक परिसरात पोटच्या मुलानेच वडिलांची निर्घुण हत्या केली आहे. अनिल मुळे असे मृत पित्याचे नाव असून आरोपी मुलगा किरण मुळे फरार आहे. किरण मुळे हा कायम दारूच्या नशेत असायचा त्यानेच आपल्या राहत्या झोपडीत झोपेत असलेल्या वडिलांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पिसादेवी येथील रहिवासी असलेले हे कुटुंब अनेक वर्षांपासून कडा शहरात मजुरीसाठी स्थायिक झालेले आहेत. आज पहाटेच्या सुमारास किरण दारूच्या नशेत घरी आला. वडील गाढ झोपेत असताना त्यांने अचानक त्यांच्या डोक्यात मोठा दगड घातला. या हल्ल्यात अनिल मुळे यांचा जागीच मृत्यू झाला.
Solapur News: करमाळ्यातून अचानक गायब होत आहेत मुली-महिला; तालुक्यात भीतीचं वातावरण!