Dombivli Namaz Incident: डोंबिवलीजवळ नमाज पठण करण्यासाठी आलेल्या दोन मुस्लीम तरुणांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सरपंच हनुमान ठोंबरे यांनी त्यांच्या काही समर्थकांसह मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे खळबळ उडालीय. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.
काय आहे प्रकरण?
डोंबिवलीजवळच्या खोणी गावात हा सर्व प्रकार घडला आहे. एक शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक गाव अशी या गावाची ओळख आहे. या गावात सर्व धर्माचे लोकं एकत्र राहतात. या गावतील मशिदीमध्ये अनेक वर्षांपासून आजूबाजूच्या पलावा, लोढा आणि इतर गावांमधील नागरिक नमाज पठणासाठी येतात. पण, गेल्या महिन्यांपासून सरपंच हनुमान ठोंबरे यांनी बाहेरून येणाऱ्या मुस्लिमांना विरोध करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अनेकदा गावात तणाव निर्माण झाला आहे.
( नक्की वाचा : Mumbai University : मुंबई विद्यापीठात ‘अल्पसंख्याक' विद्यार्थ्यावर हल्ला; प्रशासनाविरोधात तीव्र निदर्शने )
पोलिसांसमोरच मारहाण
आज, शुक्रवारी ( 19 सप्टेंबर) नमाज पठणासाठी आलेल्या लोकांमध्ये कोणताही वाद होऊ नये म्हणून त्यांनी गावाबाहेरच आपली वाहने (दुचाकी आणि तीनचाकी) उभी केली आणि पायी गावात जाण्याचा निर्णय घेतला. नजीर चाकी नावाचा तरुण लोकांना वाहने रस्त्यावर उभी करून पायी जाण्यास सांगत होता. त्यावेळी पोलिसांचा बंदोबस्तही तिथे होता. त्याचवेळी सरपंच हनुमान ठोंबरे तिथे आले आणि त्यांनी नजीर चाकीला मारहाण करायला सुरुवात केली. नजीरला वाचवण्यासाठी त्याचा मित्र हुजेर मर्चंट पुढे आला, त्यालाही ठोंबरे आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण केली.
या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे, मात्र ठोंबरे यांच्यावर अद्याप कोणतीही कठोर कारवाई झाली नसल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी मुस्लीम नागरिक एकत्रित येऊन त्यांची पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.