
ओंकार कुलकर्णी, धाराशिव: अवघ्या 1 रुपयात 4 ते 5 हजार रुपयांचे मोबाईल रिचार्ज मिळवण्याचा लोभ अनेक तरुणांना चांगलाच महागात पडला आहे. नावी नावाच्या ॲपच्या माध्यमातून केलेल्या या रिचार्ज घोटाळ्याची गंभीर दखल घेऊन संबंधित कंपनीने प्रतिनिधी मार्फत धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितु खोकर यांच्याकडे यांच्याकडे अधिकृत तक्रार अर्ज दाखल केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पोलीस प्रशासनाने याप्रकरणी तरुणांची चौकशी सुरू केली आहे. या तरुणांनी ॲपच्या ऑफरवर विश्वास ठेवत मोठ्या प्रमाणावर रिचार्ज केले होते. त्यानंतर कंपनीने त्यांच्याकडून सक्तीने वसुली सुरू केली असून बँक खातीदेखील होल्ड करण्यात आली आहेत.
नावी ॲपने "क्रिसमस ऑफर" अंतर्गत 1 रुपयात वर्षभराचे रिचार्ज देण्याचा दावा केला होता. याचाच लाभ घेण्यासाठी तरुणाची झुंबड उडाली होती. धाराशिव जिल्ह्यातील एकट्या ढोकी गावातील अंदाजे 200 ते 250 तरुणांनी या ऑफरचा लाभ घेतला शिवाय जिल्हाभरात देखील मोठ्या प्रमाणात तरुणांनी यामध्ये रिचार्जेस करून घेतले होते, यातील काही तरुणांनी मिळालेल्या या ऑफरवर प्रत्येकी दोन-दोन लाखांपर्यंतचे रिचार्ज केले होते. नंतर कंपनीने हे रिचार्ज चुकीच्या पद्धतीने झाल्याचे सांगत सक्तीने पैसे मागायला सुरुवात केली. अनेकांना ईमेलद्वारे नोटीस पाठवण्यात आल्या कंपनीच्या प्रतिनिधींनी फोन करून पैसे मागण्यास सुरुवात केली.
मात्र 1 - 2 लाख अशा मोठ्या रकमेचे रिचार्ज केल्यामुळे हे पैसे कसे भरायचे हा प्रश्न या तरुणांसमोर उभा ठाकला शिवाय आम्ही ऑफर म्हणून रिचार्ज केले आता सक्तीची वसुली का? असा सवाल देखील तरुणाना पडला आहे. यामुळेच अनेक तरुणांची बँक खाती देखील गोठवली गेली असून त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या संपूर्ण प्रकाराबाबत कंपनीचा दावा आणि तरुणांचा आरोप एकमेकांशी विरोधात आहे. तरुणांचे म्हणणे आहे की, कंपनीने आधी फ्री रिचार्जचे आमिष दाखवले आणि आता जबरदस्तीने पैसे वसूल करत आहे. तर कंपनीकडून यामागे सायबर गैरवापर आणि आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप केला जात आहे. या संपूर्ण प्रकाराची व्याप्ती देशभरात असून मोठ्या संख्येने तरुण यामुळे संकटात सापडले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world