राहुल कांबळे
नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली. महापालिका मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या दालनातच ही कारवाई करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी घेतलेल्या लाचेच्या रक्कमेची ही चर्चा सुरू आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत किती भ्रष्टाचार होत आहे याची कल्पना येते. या कारवाईने महापालिका आहे की भ्रष्टाचाराचे दुकान आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या अटकेनंतर नवी मुंबईतल्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ऐवढा मोठा अधिकारीच भ्रष्टाचार करत असेल तर त्याच्या हाताखालचे काय करत असतील अशी विचारणा होत आहे.
या प्रकरणात दशरथ सुरवते हे तक्रारदार आहे. शिवाय ते महापालिकेचे कंत्राटदार ही आहेत. त्यांनी ऐरोली विभागात 15 नोव्हेंबर 2024 ते 15 फेब्रुवारी 2025 या कालावधीत अतिक्रमणाविरोधी कारवाईसाठी मनुष्यबळ पुरवले होते. या कामाची बिलं प्रलंबित होती. ही प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी गायकवाड यांनी लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 42 हजार रुपये देण्याचे ठरले. याची माहिती सुरवते यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. त्यानुसार एसीबीने सापळा रचला होता. सर्व काही ठरलं होतं. फक्त ते लाच घेतानाची वाट पाहात होते.
कंत्राटदाराने याप्रकरणी ठाणे एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार आज सकाळी मुख्यालयात सापळा रचण्यात आला. ठरल्या प्रमाणे सुरवते हे लाचेची रक्कम घेवून नवी मुंबई महापालिकेतील त्यांच्या दालनात पोहोचले. त्यांनी ही रक्कम गायकवाड यांना देवू केली. ती रक्कम गायकवाड यांनी घेतली. लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने गायकवाड यांना ताब्यात घेतले. त्यांच्या दालनातील महत्त्वाच्या फायली आणि संगणकीय डेटा सध्या तपासला जात आहे. गायकवाड यांनी या आधी ही कुणा कुणाकडून अशी पद्धतीने लाच घेतली आहे याचा ही आता तपास केला जात आहे. त्यामुळे गायकवाड यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेत आज 'एसीबी'ने मोठी कारवाई करत भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले आहेत. उपायुक्त कैलास गायकवाड यांनी कंत्राटदाराकडून कामाचे बिल काढण्यासाठी 42 हजार रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. या कारवाईने पालिकेत प्रचंड खळबळ माजली असून इतर अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. नेहमीप्रमाणे कामकाजात व्यस्त असलेल्या मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील गायकवाड यांच्या कार्यालयात अचानक एसीबीचे पथक धडकले. कंत्राटदार सुरवते यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. ऐरोली विभागातील कामाचे पैसे मिळवून देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. या कारवाईनंतर पालिकेतील अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.