- येरवडा कारागृहात तंबाखूच्या वादातून कैद्यांच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा आणि मारहाण झाली आहे
- शुभम पोखरकर या कैद्याला मारहाण करून जखमी करण्यात आले असून त्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत
- पोलिसांनी जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी कैद्यांची चौकशी सुरू केली आहे
यशपाल सोनकांबळे
येरवडा कारागृहात राडा झाल्याची घटना घडली आहे. या आधी ही अशा घटना पुण्याच्या या जेलमध्ये झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या घटनेत कैद्यांचे दोन गट एकमेकांना भिडले. त्यानंतर जोरदार राडा झाला. यात एका कैद्याला जबर मारहाण झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. अचानक झालेल्या या राड्याने कारागृह परिसरात खळबळ उडाली. कारागृह प्रशासन ही खडबडून जागं झालं. प्रशासनाने दोन्ही गटांना काही वेळातच नियंत्रणात आणलं. पण हा राडा झाला कशावरून याचं कारण ऐकलं तर तुम्ही चाट पडाल. दरम्यान या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा राडा तंबाखू वरून झाल्याचं बोललं जात आहे. कारागृहात तंबाखू खाण्यावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये अजय राठोड आणि संतोष भालेराव या दोघांनी शुभम पोखरकर या कैद्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत शुभम पोखरकर हा जबर जखमी झाला आहे. त्यानंतर जखमी झालेल्या कैद्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच कारागृह प्रशासन आणि पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
त्यानंतर येरवडा पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. शिवाय पुढील तपास सुरू आहे. येरवडा कारागृहात अशा घटना वारंवार समोर येत आहेत. अशा घटनांमुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्था आणि कैद्यांवरील नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हाणामारीमागील नेमके कारण, त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का, तसेच वादाची पार्श्वभूमी काय होती याचा तपास पोलिस आणि कारागृह प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. संबंधित आरोपी कैद्यांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे घटनेचा तपशील उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या घटनेनंतर येरवडा कारागृहाच्या सुरक्षेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय अशा घटना वारंवार का घडत आहे? तुरूंग प्रशासनाचा काही धाक कैद्यांना आहे की नाही असं बोललं जात आहे. याबाबत तरुंग प्रशासनाने आपली भूमीका अजून ही स्पष्ट केलेली नाही.