राकेश गुडेकर, रत्नागिरी: रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील खोपी फाट्यानजीक शनिवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात तरुणांनी हवेत गोळीबार केल्याचा बनाव अखेर उघड झाला आहे. पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी प्रणित प्रमोद साळवी याच्यावर रात्री उशिरा खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कारवर दगडफेक केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. कारही पोलिसांनी तात्पुरती ताब्यात घेतली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खेड तालुक्यातील मिर्ले येथील केतन साळवी हे सेलिरिओ कारने खेड येथून खोपीच्या दिशेने जात असताना चार अज्ञात तरुणांनी हवेत गोळीबार करत कारवर दगडफेक केल्याचा कॉल कारचालकाचा भाऊ प्रणित साळवी याने पोलिसांना 112 क्रमांकावर केला होता. हवेत गोळीबार करत भावावर जीवघेणा हल्ला केल्याचे पोलिसांना कळवले होते.
त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले व अन्य सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून पंचनामा केला होता. हवेत गोळीबार झाल्याबाबत संशयास्पद असे काहीच पोलिसांना आढळले नव्हते. पोलिसांच्या अधिक चौकशीत हा बनाव असल्याचं स्पष्ट झालं. एका अनोळखी दुचाकीचा अपघात झाला होता.
त्या अपघातानंतर वादावादी आणि दगडफेक झाली होती. या प्रकारानंतर तक्रारदार यांनी आपल्या भावाला खोटी माहिती देत फायरिंग झाल्याचा बनाव रचल्याचं खेड पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. दरम्यान कारवर केवळ दगडफेक झाली असून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.