10 महिन्यांपर्यंत शौचालयात बंद, कच्चा भात-कांदा जेवण; नवं विवाहितेवर सासरच्या घरात भयंकर दुष्कृत्य

महिलेसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. महिलेला जेवणासाठी तांदूळ, कांदा आणि मिरची दिली जात होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

उत्तराखंडची राजधानी देहरादूरमध्ये एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे एका विवाहित महिलेला तब्बल १० महिन्यांपर्यंत एका खोलीत आणि शौचालयात बंद ठेवण्यात आलं. महिलेसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. महिलेला जेवणासाठी तांदूळ, कांदा आणि मिरची दिली जात होती. सातत्याने महिलेला मारहाण केली जात होती. इतकच नाही तर महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर बाटली आणि काठीने मारहाण करण्यात आली होती. पीडित महिलेसोबत हे क्रूर कृत्य तिचा पती आणि सासू-सासऱ्यांनी केल्याचं समोर आलं आहे. 

पती आणि सासरच्या मंडळींकडून मारहाण...

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना देहारादूनच्या भाऊवाला भागातील आहे. या प्रकरणात महिलेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. त्यांनी मुलीचा पती आणि सासरच्या मंडळींविरोधात मारहाण, अत्याचार आणि शौचालयात १० महिन्यांपर्यंत बंद करण्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेच्या पतीने सांगितलं की, त्यांच्या मुलीचे पती राहुल खंडुरी आणि सासरे तिला मारहाण करीत होते. तक्रारीनुसार, जुलै २०२५ ते मे २०२६ पर्यंत सासरच्या मंडळांनी त्यांच्या मुलीला एका खोलीत आणि शौचालयात १० महिन्यांपर्यंत बंद करून तिच्यासोबत अत्याचार केला होता. 

Advertisement


  
प्रायव्हेट पार्टवरही बाटल्या आणि काठीच्या जखमा...

FIR नुसार, महिलेला जेवणामध्ये केवळ कच्चा भात, कांदा आणि मिरची दिली जात होती. ज्यामुळे मुलीचं मानसिक संतुलन बिघडलं. इतकच नाही तर मुलीवर शारिरीक अत्याचार करण्यात आला. वडिलांनी आरोप केला आहे की, मुलीला खुर्ची, काठी, व्हायपर सारख्या वस्तूंनी मारहाण केली होती. इतकच नाही तर त्याच्या प्रायव्हेट पार्टवर बाटली आणि काठीच्या जखमा आढळून आल्या आहेत. १० महिन्यांपर्यंत मुलीला भेटू दिलं नाही ना तिच्याशी फोनवर बोलता आल्याचं मुलीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या डोक्यावरुन केस ओढण्यात आले होते. 

पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, जेव्हा जेव्हा ते फोन करायचे, तेव्हा त्यांना सांगितलं जायचं की, त्यांची मुलगी झोपली आहे किंवा अंघोळ करत आहे. एकदा, जेव्हा ते आपल्या मुलीला भेटायला सासरच्या घरी गेले, तेव्हा त्यांना आत जाऊ दिलं नाही. इतकेच नव्हे तर, सासरच्या मंडळींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

वडिलांनी सांगितलं की, दोन वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीचं लग्न लावून देण्यात आलं होतं. पीडितेचा पती दिल्लीत नोकरी करतो. पीडित महिलेने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता. पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की, लेकीच्या सासरच्या मंडळींनी आम्हाला दोन्ही मुलांसह भेटूही दिलं नाही.