राजा रघुवंशी यांच्या हत्येबाबत मेघालय पोलिसांनी केलेल्या खुलाशानंतर, सोमवारी राजा यांच्या आईने काही धक्कादायक खुलासे केले आहे. राजा यांची आई उमा रघुवंशी यांनी दावा केला की, मेघालयला जाण्याची योजना त्यांची सून सोनमनेच आखली होती. तिने दोघांचे जाण्याचे तिकीट बुक केले होते पण परत येण्याचं तिकीट बुक केलं नव्हतं, अशा शब्दात त्यांनी आपलं दुख व्यक्त केलं आहे. मेघालय पोलिसांनी सांगितलं आहे की, राजा रघुवंशीच्या हत्येत त्यांची पत्नी सोनम सहभागी होती. तिने सुपारी देवून ही हत्या केली होती. मेघालय पोलिसांनी या हत्याकांडातील चार संशयितांना मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मेघालय पोलिसांनी केलेल्या या खुलाशानंतर राजा रघुवंशीच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. तर सोनमच्या वडिलांनी आपल्या मुलीला निर्दोष सांगत या हत्याकांडाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. राजा रघुवंशीची आई उमा रघुवंशी यांनी पत्रकारांना सांगितलं, "माझा मुलगा सोनमच्या सांगण्यावरूनच तिच्यासोबत मेघालयला फिरायला गेला होता. त्याला इतक्या लवकर हनिमूनला जायचं नव्हतं. माझ्या मुलाने मला सांगितलं होतं की, सोनमने मेघालयच्या प्रवासाचं तिकीट बुक केलं आहे. यावर मी त्याला म्हणाले होते की, जर तिकीट बुक झालं असेल, तर त्याने पत्नीसोबत मेघालयला फिरायला जायला पाहिजे." असं उमा रघुवंशी यांनी सांगितलं. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.
पीटीआयशी त्या म्हणाल्या, "माझ्या मुलाने मला हेही सांगितलं होतं की, सोनमने मेघालयहून दोघांच्या परत येण्याचं तिकीट बुक केलं नव्हतं, पण ते सहा-सात दिवसांत तिथून इंदूरला परत येतील." उमा यांनी सांगितलं की, सोनमचे आताचे फोटो पाहिल्यानंतर आम्हाला धक्का बसला. कारण त्यांच्या मुलासोबत गेल्या महिन्यात बेपत्ता झालेल्या त्यांच्या सुनेच्या शरीरावर ओरखड्याचं एकही निशाण नाही. तर दुसरीकडे त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. राजा रघुवंशीच्या आईने सांगितलं, "मी सोनमच्या तोंडून ऐकू इच्छिते की, तिने राजाला कुठे, का आणि कोणत्या स्थितीत सोडलं होतं." त्या म्हणाल्या की, साखरपुड्यानंतर सोनम त्यांच्या मुलाला पुरेसा वेळ देत नव्हती आणि लग्नापूर्वी त्याच्यासोबत फिरण्याचंही टाळत होती. त्या पुढे सांगितात, "जेव्हा आम्ही सोनमला याबद्दल विचारलं, तेव्हा ती म्हणाली की तिला ऑफिसमध्ये अनेक कामं असतात. सोनम म्हणाली होती की, जर ती माझ्या मुलाला फोन करू शकत नसेल, तर माझा मुलगा तिला फोन करू शकतो."
तर सोनमच्या आईने मला सांगितलं होतं की, लग्नापूर्वी मुलगा-मुलगी भेटण्याबाबत त्यांच्या कुटुंबाचा विरोध आहे. लग्नापूर्वी मुलगा-मुलगी भेटणं सोनमच्या वडिलांना आवडत नाही." राजा आणि सोनमचं लग्न या जोडप्याच्या आणि दोन्ही कुटुंबांच्या संमतीने पारंपरिक पद्धतीने झालं होतं. लग्नानंतर सोनमचं वर्तन त्यांच्या कुटुंबासोबत चांगलं होतं. ज्यामुळे त्यांना तिच्यावर कोणताही संशय आला नाही. उमा म्हणाल्या, "माझा मुलगा लग्नानंतर खूप आनंदी होता. त्याने सोनमला आपली पत्नी म्हणून मनापासून प्रेम केलं होतं. आम्हाला तर अजूनही विश्वास बसत नाही की ती आपल्या पतीची हत्या घडवून आणू शकते. माझं मूल अविवाहित राहिलं असतं तर बरं झालं असतं, कारण त्याचा जीव तरी वाचला असता." असं ही त्या म्हणाल्या.
जर खरंच सोनमने त्यांच्या मुलाची हत्या घडवून आणली असेल, तर तिला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे. आपल्या नवविवाहित मुलाच्या मृत्यूच्या शोकात बुडालेल्या आईने सांगितलं, "मला रात्री खूप अस्वस्थता वाटते. मी माझ्या मुलाच्या फोटोजवळ जाऊन त्याच्याशी बोलत होते. मी त्याला सांगते की, ज्यानेही त्याच्यासोबत चुकीचं केलं, त्याला शिक्षा मिळाली पाहिजे." त्या म्हणाल्या की, राजा रघुवंशी हत्याकांडातला मुख्य संशयित राज कुशवाह याच्याबद्दल त्यांच्या मुलाला आणि कुटुंबाला कोणतीही माहिती नव्हती. दरम्यान "सोनमने उत्तर प्रदेशातील नंदगंज पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. नंतर तिला अटक करण्यात आलं." डीजीपींनी सांगितलं की, अटक केलेल्या लोकांनी खुलासा केला आहे की, सोनमने रघुवंशीच्या हत्येसाठी त्यांना सुपारी दिली होती.