गुरुप्रसाद दळवी, प्रतिनिधी
Sindhudurg Tragedy: डिजिटल माध्यमांचा निष्काळजी वापर आणि खासगी डेटा सार्वजनिक होण्याची भीती किती जीवघेणी ठरू शकते, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका अत्यंत दुःखद घटनेतून समोर आले आहे. मोबाईलमधील कथित आक्षेपार्ह डेटा हरवल्याच्या भीतीने एका प्रेमयुगुलानं त्यांचं आयुष्य संपवलं. या आत्महत्येमुळे अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत, ज्यांचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
काय आहे प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ येथील 21 वर्षांचा सोहम चिंदरकर आणि कणकवली येथील 18 वर्षांचा ईश्वरी राणे हे दोघे एकमेकांवर प्रेम करत होते. त्यांची नियमित भेटणे आणि फिरणे सुरू होते. मात्र, सोहमचा मोबाईल हरवल्यानंतर या प्रकरणात गंभीर वळण आले.
सोहमचा मोबाईल हरवल्याने त्याला प्रचंड मानसिक त्रास होऊ लागला. मोबाईलमधील आक्षेपार्ह डेटा कोणाच्या हाती लागला आणि तो सार्वजनिक झाला, तर बदनामी होईल, या भीतीने तो हादरला होता. त्याने त्याच्या आईच्या मोबाईलवरून ईश्वरीला संदेश पाठवण्यास सुरुवात केली.
( नक्की वाचा : Badlapur : बदलापूरच्या काँग्रेस नेत्याची हत्या झाल्याचं 3 वर्षांनी उघड, नवऱ्यानं घरात आणला होता साप आणि.... )
या संदेशात त्याने याच भीतीने आत्महत्या करत असल्याचे कळवले. ईश्वरीने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेवटी ईश्वरीने देखील 'तुमच्याशिवाय जीवन जगणे असह्य होईल, म्हणून आपण दोघेही जीवन संपवूया,' असा संदेश पाठवला, अशी माहिती मिळत आहे.
हरवलेला मोबाईल शोधायला जातो, असे सांगून सोहम सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्याचप्रमाणे, औषधे आणते असे सांगून बाहेर पडलेली ईश्वरी देखील घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. याच दरम्यान, सोहमच्या आईच्या मोबाईलमध्ये सोहम आणि ईश्वरी यांच्यातील आत्महत्येसंदर्भातील संदेश उघड झाले. त्यामुळे, पोलिसांसह सर्वांनी कणकवली तालुक्यातील तरंदळे धरणाकडे धाव घेतली.
( नक्की वाचा : Haseen Mirza : दाऊदच्या पहिल्या बॉसची कन्या आज रस्त्यावर? हतबल हसीन मिर्झांची थेट PM मोदींना विनंती,पाहा VIDEO )
पहाटेच्या वेळी आधी सोहमचा आणि त्यानंतर ईश्वरीचा मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. या घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर आली. सोहमचा मोबाईल खरंच हरवला नव्हता, तर त्याने तो विकला होता, अशी माहिती पुढे येत आहे. पोलिसांनी तो मोबाईल मिळवला आहे. मात्र, तपासामध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पोलीस या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही माहिती देण्यास सध्या हात आखडता घेत आहेत.
सोहमचा मोबाईल खरोखरच हरवला होता की त्याने तो विकला होता? मोबाईलमध्ये नेमका कोणता आक्षेपार्ह डेटा होता? दोघांनी आत्महत्या करण्याचा एवढा टोकाचा निर्णय नेमका कशासाठी घेतला? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत आणि पोलिसांच्या पुढील तपासानंतरच यावर प्रकाश पडू शकेल.