Ulhasnagar News: उल्हासनगरमध्ये एका मुस्लीम तरुणानं स्वतःचं नाव विजय असल्याचं खोटं सांगून एका हिंदू तरुणीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न केल्यानंतर या तरुणीचा छळ करण्यात आल्यानं परिसरात संतापाची लाट उसळली आहे. खोट्या नावानं लग्न करून तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या तरुणाचं खरं रूप लग्नानंतर काही दिवसांतच समोर आलं आहे.
काय आहे प्रकरण?
हा सर्व प्रकार उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. पीडित तरुणीला लग्नानंतर आरोपी पती इम्रान शेख यानं बिहारमध्ये नेलं. तिथे गेल्यानंतर तिला सत्य परिस्थिती समजली. आरोपीनं तिला मुस्लीम रीतीरिवाजाप्रमाणे राहण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तिला बुरखा आणि हिजाब घालण्याची सक्ती करण्यात आली. पीडित तरुणीनं दिलेल्या तक्रारीनुसार, तिला तिथे केवळ धार्मिक बंधनेच घातली गेली नाहीत, तर तिचा शारीरिक आणि मानसिक छळही करण्यात आला.
( नक्की वाचा : Ulhasnagar News: जात पंचायतीचा आदेश मोडल्याने महिलांचे कापले केस, गळ्यात चपलांचा हार; उल्हासनगरमधील संतापजनक प्रकार )
धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
पीडित तरुणीनं पोलिसांना दिलेल्या माहितीत अनेक गंभीर आरोप केले आहेत. आरोपी पती आणि त्याच्या कुटुंबाकडून तिला गोमांस खाण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत होती. याशिवाय, हिंदू देवी-देवतांचा अपमान करून तिला शिवीगाळ केली जात होती. स्वतःची ओळख लपवून लग्न करणं आणि त्यानंतर धर्मांतरासाठी दबाव टाकून क्रूर वागणूक देणं, अशा तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
( नक्की वाचा : Dombivli News : डोंबिवलीत घरांच्या नावाखाली कोट्यवधींची लूट; संरक्षण खात्याच्या जमिनीवर बांधल्या चाळी, शेकडो.. )
या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी एकूण 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पती इम्रान शेख, त्याचे 2 भाऊ, आई-वडील आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा समावेश आहे. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत मुख्य आरोपी इम्रान शेख आणि त्याच्या 2 भावांना बेड्या ठोकल्या आहेत. इतर आरोपींचा शोध सध्या सुरू असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळं शहरात सुरक्षेचा आणि फसवणुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.