प्रतिक राठोड, प्रतिनिधी
Yavatmal News : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुली बेपत्ता होत असल्याचे वृत्त समोर येत आहेत. अल्पवयीन मुलींचं अपहरण करून त्यांची दुसऱ्या राज्यात तस्करी केली जात असल्याच्या बातम्याही समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मर्दानी-३ या सिनेमातही अल्पवयीन मुलींच्या तस्करीचं भयाण परिस्थिती दाखविण्यात आलं होतं. दरम्यान यवतमाळमधूनही एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आदिवासी समाजातील तब्बल ३४ मुली बेपत्ता...
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या सहा महिन्यांत आदिवासी समाजातील तब्बल 34 मुली बेपत्ता झाल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात मानवी तस्करीचा संशय व्यक्त केला जात आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांनी या प्रकरणावर गंभीर आरोप करत एक मुलगी आणि तिच्या प्रियकरामधील ऑडिओ क्लिप हाती लागल्याचा दावा केला आहे. या क्लिपमध्ये मुलींना फूस लावून बाहेर राज्यात नेण्याची पद्धत उघड होत असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपचे गंभीर आरोप...
या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून राळेगाव येथील मजहर कुरेशी याचं नाव समोर येत आहे. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, मात्र नंतर सोडून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी तेलंगणाकडे पळून जात असताना पुन्हा पकडण्यात आल्याची माहिती आहे. भाजपकडून पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं असून आरोपीला मदत करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पालकांना पैशाचं आमिष दाखवून मुलींना फसवलं जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणात ‘लव्ह जिहाद' आणि धर्मांतराचा अँगलही असू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली असून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकार आणि गृह विभागाकडे याबाबत माहिती देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.