- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसून भाजपला १९३ जागांवर आघाडी मिळाली आहे
- ममता बॅनर्जींच्या अजेय प्रतिमेला १५ वर्षांनंतर मोठा तडाखा बसला असून टीएमसीची सत्ता गमावण्याची शक्यता वाढली आहे
- भाजपच्या विजयामुळे पूर्वेकडील राज्यांमध्ये त्यांची सत्ता मजबूत होत आहे
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत तृणमूल काँग्रेसला (TMC) मोठा धक्का बसताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलांनुसार, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी सत्ता गमावताना दिसत आहे. राज्यात प्रथमच भाजपचे सरकार येण्याचे संकेत मिळत आहेत. दुपारच्या कलानुसार, भाजप 193 जागांवर आघाडीवर आहे, तर टीएमसीला केवळ 97 जागांवर समाधान मानावे लागत आहे. 2021 मध्ये भाजपला 77 जागा मिळाल्या होत्या. म्हणजेच यंदा त्यांना 116 जागांचा मोठा फायदा होताना दिसत आहे.
ममता बॅनर्जींच्या 'अजेय' प्रतिमेला तडा
या निकालाचा सर्वात मोठा अर्थ म्हणजे ममता बॅनर्जी यांची गेल्या 15 वर्षांपासूनची 'अजेय' प्रतिमा आता संपुष्टात आली आहे. 2014, 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका असोत किंवा 2016 आणि 2021 च्या विधानसभा निवडणुका, ममता बॅनर्जींनी आपला गड राखला होता. मात्र, यंदा भाजपने हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यात यश मिळवले आहे.
विरोधी आघाडीत 'ममता' कार्ड कमकुवत होणार
राष्ट्रीय स्तरावर 'INDIA' आघाडीमध्ये काँग्रेस नंतर ममता बॅनर्जी या सर्वात वजनदार नेत्या मानल्या जात होत्या. मात्र, बंगालमधील या पराभवामुळे आघाडीतील त्यांचे महत्त्व आणि आक्रमकता कमी होण्याची शक्यता आहे. भाजपवर प्रखर टीका करणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची असलेली ओळख आता बचावात्मक पवित्रा घेण्याकडे झुकू शकते.
भाजपचे 'मिशन ईस्ट' फत्ते
जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मातृभूमीत सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे अनेक वर्षांचे स्वप्न आता पूर्ण होताना दिसत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारनंतर आता पश्चिम बंगालमध्येही भाजपची सत्ता आल्याने हिंदी पट्ट्यासह पूर्व भारतातही कमळ फुलले आहे. ईशान्य भारताचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या बंगालमधील हा विजय भाजपसाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे.
नक्की वाचा - Assembly election Result LIVE 2026: तामिळनाडूत डीएमके तर केरळमध्ये काँग्रेस आघाडीवर
मोठ्या राज्यावर भाजपची सत्ता
पूर्वेकडील सर्वात मोठे राज्य म्हणून पश्चिम बंगालकडे पाहीले जात होते. आता या राज्यावर भाजपची सत्ता आली आहे. भाजपने अनेक वर्षांपासून हे राज्य ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू ठेवल्या होत्या. त्याला आज अखेर यश आले आहे. पूर्वेकडील राज्यात भाजपची सत्ता आहे. पण त्याचे प्रवेश द्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम बंगाल आता भाजपच्या ताब्यात आल्याने भाजपची ताकद वाढली आहे. 2029 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालची भूमीका महत्वाची ठरणार आहे.
विरोधकांचा आवाज क्षीण होणार
ममता बॅनर्जींसारखा खंदा लोकशाहीवादी योद्धा आपल्याच राज्यात पराभूत झाल्यामुळे देशातील विरोधकांच्या मनोधैर्यावर परिणाम होणार आहे. या निकालाचे पडसाद पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरही उमटू शकतात. जिथे अखिलेश यादव यांना आता अधिक खबरदारीने पावले उचलावी लागणार आहेत.