- तामिळनाडूचे भाजप नेते के. अन्नामलाई यांनी मुंबईला बॉम्बे म्हणून विवादास्पद वक्तव्य केले आहे
- शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी के. अन्नामलाई यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ ट्वीट केला आहे
- चित्रे यांनी भाजपला इशारा देत म्हटले की मराठी माणसाला चिथावू नका आणि मुंबईला बॉम्बे म्हणणे सहन होणार नाही
मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी हा मुद्दा केंद्र स्थानी आहे. अशातच भाजपने विरोधी पक्षांच्या हातात आयतं कोलीत दिलं आहे. त्याचं कारण ही तसचं आहे. तामिळनाडूचे भाजप नेते के. अन्नामलाई हे भाजपचा प्रचार करण्यासाठी मुंबईक आले होते. त्यावेळी त्यांनी मुंबईचा उल्लेख हा बॉम्बे असा केला. बरं ते येवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी बॉम्बे हे काय महाराष्ट्राचे शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे असे ही म्हटले आहे. त्यांचा हा व्हिडीओ शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी आपल्या X अकाऊंटवर ट्वीट केला आहे. शिवाय त्यांना शिवसेनेच्या शैलीत इशारा ही दिला आहे. हा व्हिडीओ ही सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
के. अन्नामलाई यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार चित्रे यांनी घेतला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये, शेवटी पोटातलं ओठांवर आलंच. भाजपाला आम्ही शेवटचं सांगतोय, निवडणुका गेल्या तेल लावत पण मुद्दामहून असल्या बांडगुळांना आणून मराठी माणसाला चिथावू नका. पुन्हा तुमचा कुणी भाजपावाला मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला आणि बलिदान देऊन मिळवलेल्या मुंबईवरून मराठी माणसालाच हिणवलं तर तुमची मराठी माणसाशी गाठ आहे, हे लक्षात असू द्या. असा इशाराच त्यांनी या माध्यमातून दिला आहे.
भाजपवर टीका करताना त्यांनी शहरांची नावे फक्त शब्द नसतात तर भाषा, संघर्ष, अभिमान आणि स्वाभिमान दर्शवतात. मुंबई म्हणजे मुंबईच! बॉम्बे नाही! जय महाराष्ट्र! असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये शेवटी लिहीलं आहे. के. अन्नामलाई हे तामिळनाडूचे भाजप नेते आहेत. ते प्रदेशाध्यक्ष ही राहीले आहेत. चेन्नईला कुणी मद्रास म्हटले तर राग येतो. तिथे भाषेचा मोठा अभिमान बाळगला जातो. अशा राज्यातून येणाऱ्या अन्नामलाई यांनी मुंबईत येवून मुंबईला बॉम्बे बोलणे म्हणजे विरोधकांच्या हाती आयते कोलित देण्या सारखेच म्हणावे लागेल.
मुंबई महापालिकेची निवडणूक ही मराठी माणूस आणि मराठी भाषे भोवती फिरत आहे. शिवाय भाजपचा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने आणि मनसेने केला आहे. त्यामुळे हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. त्यावरूनच सध्या आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशा वेळी अन्नमलाई यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे करणं हे भाजपला महागात पडू शकतं. शिवाय मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नाही असं ही त्यांनी वक्तव्य केलं आहे. याचा जोरदार वापर ठाकरे बंधू आपल्या प्रचारात करतील असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.