- महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार मंगळवारी संध्याकाळी संपला असून त्यानंतर घरोघरी प्रचाराला मुभा देण्यात आली आहे
- राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले की प्रचार संपल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा निर्णय नवीन नाही
- २०१२ मध्ये जारी केलेल्या आदेशानुसार मतदान केंद्राच्या १०० मीटर बाहेर उमेदवारांना मतदारांना भेटण्याची परवानगी
महापालिका निवडणुकांसाठीचा प्रचार मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता संपला. मात्र त्यानंतर ही उमेदवारांना घरोघरी जावून प्रचार करता येईल असं राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलं. घरोघरी जावून प्रचार करण्याला मुभा देण्यात आली. त्यावरून विरोधकांनी आयोगावर जोरादार टीका केली. असं आधी कधीच घडलं नव्हतं. प्रचाराला की पैसे वाटपाला मुभा दिली जात आहे असा आरोप ही करण्यात आला. शिवाय आयोग कुणाच्या सांगण्यावरून हा निर्णय घेत आहे असा प्रश्न ही विचारण्यात आला. त्यानंतर खरोखर प्रचार संपल्यानंतर घरोघरी जावून प्रचार करता येतो का? त्यासाठी नियम आणि तरतूद काय आहे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्याचं उत्तर आता राज्य निवडणूक आयोगानेच दिले आहे.
निवडणूक आयोगावर झालेल्या टिकेनंतर आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. महानगरपालिका निवडणूकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कुठलाही नवीन आदेश काढलेला नाही असं स्पष्ट केले आहे. त्यासंदर्भातला आदेश जुनाच असून तो राज्य निवडणूक आयोगाने 14 फेब्रुवारी 2012 मध्येच निर्गमित केलेला आहे असं ही आयोगा तर्फे सांगण्यात आलं आहे.
जाहीर प्रचाराच्या समाप्तीनंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने नवीन नियम लागू केला अशा बातम्या समोर आल्या. शिवाय यावरून विरोधकांनी ही टिकेची झोड उठवली. काही बातम्या ही प्रसारीत झाल्या. पण ही वस्तुस्थितीला धरुन नाही असं मत राज्य निवडणूक आयोगाने व्यक्त केलं आहे. याबाबतचा आदेश हा जुनाच आहे. त्या 14 फेब्रुवारी 2012 रोजीच्या आदेशानुसार जाहीर प्रचार समाप्तीनंतर उमेदवार हे मतदान केंद्राच्या 100 मीटर बाहेर मतदारांना भेटून आणि घरोघरी जाऊन प्रचार करु शकतील असं या आदेशात आहे. परंतु माईकचा वापर करता येणार नाही. शिवाय उमेदवारांना समुहानेदेखील फिरता येणार नाही असं हा आदेश सांगतो.
त्यामुळे घरोघरी जावून प्रचार करण्याचा कोणताही नवा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला नाही. तो जुनाच निर्णय असल्याचं आयोगाने स्पष्ट केले आहे. या निर्णयाचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला होता. राज ठाकरे यांनी मतदानाच्या एक दिवस आधी मतदारांच्या भेटीगाठी घेण्याबाबतच्या नवीन नियमावर प्रश्न उपस्थित केले होते. सरकारला मदत करण्यासाठी निवडणूक आयोग काम करत आहे असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला होता. दुसऱ्या दिवशी 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटता येईल, मात्र पत्रके वाटता येणार नाहीत. असा नियम कशासाठी? याचा अर्थ तुम्ही पैसे वाटू शकता असा होतो का?" असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.