- वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जागावाटपाचा तिढा अखेर सुटला
- भाजपने या वाटाघाटीत 84 जागा आपल्या पदरात घेतल्या आहेत
- शिवसेना शिंदे गटाला 24 जागा मिळाल्या असून अजून काही जागांसाठी शिवसेना नेते प्रयत्न करत आहेत
मनोज सातवी
वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा बहुचर्चित तिढा अखेर सुटला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने या महापालिकेत युतीत लढण्याचा निर्णय घेतला आहे. जागा वाटपाबाबत शिवसेनेचे नेते रवींद्र फाटक आणि भाजप आमदार राजन नाईक यांच्यात चर्चा झाली. चर्चेनंतर जागा वाटपावर तोडगा निघाला. मात्र या वाटाघटीत भाजपने स्पष्ट सरशी साधल्याचं स्पष्ट पणे दिसून येत आहे. भाजपने जवळपास 84 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या आहेत. पण दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या पदरात अपेक्षे पेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे या जागा वाटपानंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये काय प्रतिक्रीया येते हे पाहावे लागणार आहे.
या वाटाघटीत भाजपच्या आमदारांचे पारडे जड राहीले. भाजपने या वाटाघाटीत जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या आहेत. तर शिवसेनेचे आमदार विलास तरे आणि रवींद्र फाटक यांना अपेक्षित जागा आपल्या पदरात पाडून घेण्यात यश मिळाले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सध्या तीन ते चार जागांबाबतचा तिढा कायम असून तोही लवकरच सुटेल, असा विश्वास महायुतीतील नेत्यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला 24 जागा आल्या आहेत. आणखी काही जागा आपल्याला मिळतात का यासाठी शिवसेना नेते प्रयत्न करणार आहेत.
दरम्यान, महायुतीचे उमेदवार शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती भाजपचे आमदार राजन नाईक यांनी दिली. वसई-विरारच्या राजकारणात या जागावाटपाने नव्या समीकरणांना सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. वसई विरारमध्ये महायुतीची लढत ही भाई ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी बरोबर असेल. विधानसभा निवडणुकीत भाजपने ठाकूरांच्या वर्चस्वाला धक्का पोहोचवला होता. याचा वचपा काढण्यासाठी ठाकूर उत्सुक आहेत. त्यात शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेसही या ठिकाणी मैदानात असेल.