चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगु देसम पक्षाला ( Chandrababu Naidu's TDP) निवडणूक निकालानंतर अच्छे दिन आले आहेत. लोकसभा निवडणुकीत तेलुगु देसमचे 16 खासदार निवडून आले आहेत. आंध्र विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या पक्षानं 175 पैकी 135 जागा जिंकत स्वबळावर बहुमत मिळवलंय. या डबल गुड न्यूजनंतर आणखी एक धमाकेदार बदल नायडूंच्या आयुष्यात या निवडणुकीनंतर झालाय. निवडणूक निकालानंतर पाच दिवसांमध्येच नायडूंच्या पत्नी नारा भुवनेश्वरी (Nara Bhuvaneshwari) संपत्तीध्ये 535 कोटींची वाढ झालीय. तर मुलगा नारा लोकेशच्या (Nara Lokesh) संपत्तीमध्ये 237 कोटींची वाढ झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कशी झाली संपत्तीमध्ये वाढ?
चंद्राबाबू नायडू यांनी स्थापन केलेल्या हेरिटेज फूडचे शेअर्सची किंमत 3 जून रोजी 424 रुपये होते. आज (शुक्रवार, 7 जून) रोजी या शेअर्सची किंमत 661.25 रुपये इतकी आहे. नायडू यांनी 1992 साली या कंपनीची स्थापना केलीय. 'ही देशात सर्वाधिक वेगानं वाढणारी सूचीबद्ध कंपनी आहे, असा दावा या कंपनीच्या वेबसाईटवर करण्यात आलाय.
डेअरी आणि अक्षय ऊर्जा हे या कंपनीचे दोन विभाग आहेत. आंध्र प्रदेश, तेलंगना, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, ओडिशा, NCR दिल्ली, हरयाणा, राजस्थान, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यात सध्या या कंपनीचे दूध आणि दूग्धजन्य पदार्थांची विक्री होते.
( नक्की वाचा : Explainer नितीश कुमार, नायडूंना भाजपाकडून लोकसभा अध्यक्षपद आणि अर्थमंत्रालय का हवंय? )
नारा भुवनेश्वरी या कंपनीच्या सर्वात मोठ्या शेअरहोल्डर आहेत. BSE च्या डेटानुसार त्यांच्याकडं 2,26,11,525 समभाग आहेत. तर चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांच्याकडं 1,00,37,453 समभाग आहेत. शेअर्समधील तेजीनंतर नारा लोकेश यांच्या संपत्तीमध्ये 237.8 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
4 जून रोजी जाहीर झालेले लोकसभा निवडणुकीचे निकाल हे नायडूंच्या संपत्तीमध्ये वाढ होण्याचं कारण आहे. तेलुगु देसम पार्टीनं आंध्र प्रदेशात 17 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी 16 जागा जिंकल्या आहेत. NDA ला मिळालेल्या बहुमतामध्ये त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे.
( नक्की वाचा : मुस्लीम आरक्षण हवेच, NDA च्या प्रमुख पक्षाची मागणी )
राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं लोकसभा निवडणुकीत 543 पैकी 293 जागा जिंकल्या आहेत. गेल्या दोन लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपाला यंदा 240 जागा मिळाल्यात. स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 272 या संख्याबळापेक्षा या जागा 32 नं कमी आहेत.