- महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने ७३१ जागांपैकी २२७ जागा जिंकून पहिला क्रमांक मिळवला आहे
- सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून तेथे त्यांना पाठिंब्याची गरज नाही
- राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्हा परिषदेत ७३ पैकी ४८ जागा जिंकून गड कायम राखला आहे
राज्यातील 12 जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुक निकालावरून भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. जिल्हा परिषदेच्या 731 जागां पैकी भाजपने 227 जागांवर मुसंडी मारत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर दुसऱ्या स्थानी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यांना एकूण 168 जागांवर विजय मिळाला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे. त्यांना 161 जागा मिळाल्या. तर विरोधी पक्षातल्या काँग्रेसला 59 जागा जिंकता आल्या. तर शिवसेना ठाकरे गटाला 46 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. 12 जिल्हा परिषदां पैकी 7 जिल्हा परिषदांवर भाजपचा जिल्हाध्यक्ष होईल असा दावा भाजपने केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदेत कोणाची सत्ता येणार हे आपण पाहाणार आहोत.
भाजपची सत्ता कुठे कुठे?
भाजपला सिंधुदुर्ग आणि सोलापूर या जिल्हा परिषदेमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे इथं भाजपला कोणत्या ही पक्षाच्या पाठिंब्याची गरज पडणार नाही. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 50 जागां पैकी भाजपने स्वबळावर 27 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे इथं भाजपचा जिल्हाध्यक्ष होणार आहे. शिवाय सोलापूर जिल्हा परिषदेत 36 जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे इथं ही भाजपला पुर्ण बहुमत आहेत. 68 जागा असलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपने एकतर्फी विजय मिळवला आहे. अन्य जिल्हा परिषदेत ही भाजपला जिल्हाध्यक्ष करण्याची संधी आहे पण त्या ठिकाणी त्यांना मित्र पक्षांवर अवलंबून राहवं लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला कुठे संधी?
अजित पवारांच्या मृत्यूनंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत अजित पवारांनी त्यांचा गड असलेला पुणे जिल्हा राखला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या 73 जागां पैकी 48 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा आहे. पुणे शिवाय अन्य महापालिकेत ही राष्ट्रवादीला सत्तेची संधी आहे. पण स्वबळावर पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादीने जिंकली आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या पारड्यात काय?
शिवसेना शिंदे गटाने ही या निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. शिवसेना शिंदे गटाला रत्नागिरी जिल्ह्यात स्वबळावर सत्ता स्थापता येणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 56 जागां पैकी तब्बल 40 जागा शिवसेना शिंदे गटाने जिंकल्या आहेत. त्यामुळे इथं शिवसेना शिंदे गटाची एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे इथं शिंदे सेनेचा जिल्हाध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उदय सामंत यांनी एक प्रकारे आपला गड इथं राखला आहे.
महायुतीला 'या' जिल्हा परिषदेत संधी
काही जिल्हा परिषदांमध्ये मात्र कोणत्याच एका पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे इथं महायुतीतल्या मित्र पक्षांना एकमेकांना मदत करावी लागणार आहे. रायगड जिल्हा परिषदेत शिवसेना शिंदे गट सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेनेला 21 जागा मिळाल्या आहेत. पण इथं भाजप आणि राष्ट्रवादीची युती होती. त्यात राष्ट्रवादीला 16 तर भाजपला 15 जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष होवू शकतो.
भाजपला मित्र पक्षांना सोबत घ्यावं लागणार
लातूरमध्ये ही भाजप आणि राष्ट्रवादीला एकत्र यावे लागणार आहे. तिथे काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. पण हे दोघे एकत्र आल्यास सत्ता स्थापन करू शकतात. कोल्हापूरमध्ये ही भाजप आणि राष्ट्रवादीला एकत्र यावं लागणार आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला शिवसेनेला सोबत घ्यावं लागणार आहे. तिच स्थिती परभणी जिल्हा परिषदेत ही आहे. तर साताऱ्यात भाजप जरी सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी तिथे त्यांना पूर्ण बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे तिथे भाजपला राष्ट्रवादीच्या मदतीची गरज आहे. तसं झाल्यास साताऱ्यातही भाजपचा जिल्हाध्यक्ष होवू शकतो.
विरोधकांच्या वाट्याला एक जिल्हा परिषद?
12 पैकी केवळ एक जिल्हा परिषद विरोधकांच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा परिषदेत भाजपला सत्ता स्थापनेसाठी कसरत करावी लागणार आहे. या जिल्हा परिषदेत 61 जागां पैकी सर्वाधिक जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाने जिंकल्या आहेत. त्यांच्या वाट्याला 18 जागा आल्या आहेत. तर काँग्रेसने 11 जिंकल्या आहेत. भाजपला 16, शिवसेना शिंदे गटाला 7, राष्ट्रवादी अजित पवार 6, आणि सदाभाऊ खोत यांच्या पक्षाचा 1 सदस्य निवडून आला आहे. त्यामुळे महायुतीचे संख्याबळ 30 होत आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गट यांची ही सदस्य संख्या 30 होत आहे. त्यामुळे इथं निवडून आलेल्या जनसुराज्य पक्षाच्या उमेदवाराला चांगलाच भाव आला आहे. तो ज्या आघाडीला पाठिंबा देईल त्याचा जिल्हाध्यक्ष होणार आहे.