'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्यातील एका डायलॉगने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. "हिंदू एक डरपोक कौम है" हा संवाद जहूर मिस्त्री नावाच्या दहशतवादाची भूमिका करणाऱ्या विवेक सिन्हा यांच्या तोंडी आहे. हा डायलॉग ऐकून प्रेक्षक इतके संतापले आहेत की त्यांनी विवेक सिन्हा यांनाच खरा दहशतवादी समजून ट्रोल करण्यास आणि धमक्या देण्यास सुरुवात केली आहे.
अभिनयाची ताकद की प्रेक्षकांचा राग?
विवेक सिन्हा यांनी इंस्टाग्रामवर त्यांना मिळालेल्या मेसेजेसचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. अनेक युजर्सनी "तुला पाकिस्तानात येऊन मारू", अशा धमक्या दिल्या आहेत. तर काहींनी अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे. विवेक सिन्हा म्हणतात की, "लोकांना माझ्या पात्राचा इतका तिरस्कार वाटत आहे, याचाच अर्थ मी माझे काम चोख बजावले आहे. ही माझ्या अभिनयाला मिळालेली सर्वात मोठी दाद आहे."
(नक्की वाचा- Deepika Padukone: दीपिकाचा संयम सुटला! मुंबईच्या सद्यस्थितीवर ट्वीट; BMC ला टॅग करत म्हणाली...)
दिग्दर्शक आदित्य धर यांचे कौतुक
विवेक यांनी एका मुलाखतीत सांगितले की, दिग्दर्शक आदित्य धर यांनी ट्रेलरची सुरुवात त्यांच्याच डायलॉगने केली, याचे त्यांना आश्चर्य वाटले. आदित्य धर यांनी सेटवर इतके उत्तम वातावरण दिले होते की, जहूर मिस्त्रीचे क्रूर पात्र साकारणे सोपे झाले. एका युजरने लिहिले की, "मला राग येत असल्याने तुला शिव्या द्याव्याशा वाटतात, पण तुझा अभिनय पाहून मी तुझी फॅन झाली आहे."
कोण आहे विवेक सिन्हा?
उत्तर प्रदेशातील बिजनौर (धामपुर) येथील रहिवासी असलेले विवेक सिन्हा बॉलिवूडमधील एक ओळखीचा चेहरा बनत आहेत: याआधी त्यांनी 'दिल्ली क्राईम सीजन 3', 'तांडव' यांसारख्या वेब सीरिजमध्ये आणि मनोज बाजपेयी यांच्या 'एक ही बंदा काफी है' या चित्रपटात काम केले आहे. 'धुरंधर'मधील या नकारात्मक भूमिकेमुळे त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली आहे.