April May 99 Marathi Movie Teaser : विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपून लवकरच त्यांच्या उन्हाळी सुटी सुरू होतील. यंदाची उन्हाळ्याची सुटी अधिक धमाकेदार होणार आहे. कारण 16 मे रोजी मापुस्कर ब्रदर्सचा 'एप्रिल मे ९९' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचा जबरदस्त टीझर लाँच करण्यात आलाय. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखनं स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे 'एप्रिल मे ९९'चे टीझर लाँच करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'एप्रिल मे ९९' या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुटीतील गोड आठवणींची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळेल. टीझरमध्ये कोकणातील निसर्गसौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे. तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद लुटणाऱ्या मुलांची मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. 'एप्रिल मे ९९' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले आहे. तर राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी, मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सिनेमाचे सहनिर्माते आहेत.
(नक्की वाचा : Exclusive : निपुण धर्माधिकारीने मराठी सिनेमाबाबत केली मोठी भविष्यवाणी)
रोहन मापुस्कर म्हणतात, मी खूप भाग्यवान...
दिग्दर्शक रोहन मापुस्कर सिनेमाबाबत म्हणतात की, "मी खूप भाग्यवान आहे. माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय. पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते झाले. आता टीझर लाँच रितेश सरांच्या हस्ते. मी रितेश सरांसोबत दोन चित्रपटांसाठी काम केले आहे. हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाच्या टीझरचे लाँचिंग होणे, ही आनंदाची बाब आहे. माझ्या कामात मला नेहमीच त्यांचे पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिकच खास झाला आहे".
(नक्की वाचा: Exclusive फुलवंतीमधील शास्त्रीबुवांची जबाबदारी मोठी होती: गश्मीर महाजनी)
"आठवणींना उजाळा देणारा सिनेमा"
निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात,"एप्रिल मे ९९ हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे. सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच नॉस्टेल्जिक बनवेल. तरुणाईलाही तितकाच भावेल. खूप हलकीफुलकी कथा आहे, जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल."