Kangana Ranaut: अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) सध्या तिचा आगामी 'भारत भाग्य विधाता' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच निमित्ताने तिने 'आयएएनएस'ला (IANS) एक मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने महिलांचे जीवन, लग्न, करिअर आणि समाजातील त्यांचे योगदान यावर मनमोकळेपणाने चर्चा केली. यावेळेस तिची को-स्टार स्मिता तांबेने कंगनाला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नावर कंगनाने अतिशय मजेशीर उत्तर दिले. अभिनेत्री स्मिता तांबे (Smita Tambe) म्हणाली की, कंगना तिच्या एका प्रश्नाचे उत्तर देत नाहीये की ती लग्न कधी करणार? यावर कंगनाने मिश्कीलपणे उत्तर दिले, "आमचे बोलणे यावर नव्हते की कोण स्वतःच्या आयुष्यात काय करत आहे. आम्ही सामान्यतः आपल्या आयुष्यातील अनुभवांबद्दल बोलत होतो. पण हो, स्मिता माझ्यासाठी मुलगा नक्कीच शोधत आहे."
लग्नाबाबत काय म्हणाली कंगना राणौत
यानंतर जेव्हा तिला विचारण्यात आले की, अनेक यशस्वी महिला लग्न करण्याचा निर्णय घेण्यास इतका वेळ का लावतात? तेव्हा कंगनाने (Kangana Ranaut) याला प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक जीवनप्रवास असल्याचे सांगितले. ती म्हणाली, "मी म्हणेन की प्रत्येकाचा स्वतःचा एक जीवनप्रवास असतो. माझ्यासोबतच्या सहकलाकारांमध्ये सर्वजणी विवाहित आहेत आणि दोघींना मुलेही आहेत, पण प्रत्येकीचा अनुभव वेगळा असतो. जसे की गिरिजा खूप कमी वयात आई झाली होती, जी कोणासाठीही अत्यंत कठीण परिस्थिती असते. प्रत्येक महिलेचा स्वतःचा वेगळा प्रवास असतो. माझ्या बाबतीत सांगायचे तर, माझा विवाहसंस्थेवर विश्वास आहे. असे नाही की माझा लग्नावर विश्वास नाही, पण हे सत्य आहे की दीर्घकाळापासून लग्न ही बाब माझी प्राधान्य राहिलेली नाही. मी कायम करिअरला प्राधान्य दिलंय."
वयाच्या 16 व्या वर्षी करिअरला सुरुवात, 29 व्या वर्षी मिळाले यश
आपल्या करिअरची सुरुवात आणि यशाच्या प्रवासाची आठवण करून देत कंगना (Kangana Ranaut) म्हणाली, "मी वयाच्या 16व्या किंवा 17व्या वर्षी काम करायला सुरुवात केली होती, पण मला यश वयाच्या 29 व्या वर्षी मिळाले, जेव्हा मी 'तनु वेड्स मनु' आणि 'क्वीन' यासारखे सिनेमे केले. यानंतर मला आयुष्यात अनेक निर्णय घ्यावे लागले. माझे आई-वडील म्हणायचे, 'हा कसा विचार आहे, मुली असा विचार करत नाहीत.' पण मला नेहमी वाटायचे की मला माझ्या पद्धतीनेच पुढे जायचे आहे."
(नक्की वाचा : VIDEO: अजय देवगणच्या मुलाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! 15 वर्षांच्या युगचा अफलातून व्हिडीओ, काजोलही जबरा फॅन)
नर्सच्या कामावर कंगना रणौतने व्यक्त केले मत'IANS'च्या या मुलाखतीत जेव्हा नर्सला मिळणारे कमी वेतन आणि त्यांचे कठीण काम याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा कंगना राणौत म्हणाली की, "मला असे वाटते की ज्या समाजात प्रत्येक काम केवळ आर्थिक देवाणघेवाण बनते, तो समाज हळूहळू अधोगतीकडे जातो. जेव्हा आपण घरगुती कामांबद्दल बोलतो, जसे की महिलांनी कपडे धुतले तर आपण 4 हजार रुपये वाचवतो, त्यांनी स्वयंपाक केला तर आपण 6 हजार रुपये वाचवतो; हे ऐकून माझ्या मनात एक भावनिक अस्वस्थता निर्माण होते की हा विचार कसा आहे? जर लोकांनी कामाचा आदर केला, त्याकडे भावनिक दृष्टिकोनातून पाहिले आणि त्यांचे काम सोपे करण्याचा प्रयत्न केला, तर देशाची अर्थव्यवस्था आपोआप वाढू लागेल. मी या सिनेमात नर्सची भूमिका साकारून हेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की त्या किती धाडसी, स्वतंत्र आणि समर्पित असतात."
'भारत भाग्य विधाता' सिनेमात नेमके काय पाहायला मिळणार?
'भारत भाग्य विधाता' या सिनेमाबद्दल सांगायचे तर, हा सिनेमा 2008 मधील मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे आणि कामा हॉस्पिटलमध्ये घडलेल्या वास्तविक घटनांवर प्रेरित असल्याचे म्हटले जात आहे. सिनेमात कंगना राणौत 'गीता माधव' नावाच्या नर्सची भूमिका साकारत आहे, जी रुग्णालयात रुग्णांची सेवा करते आणि आपल्या कर्तव्याला सर्वोपरी मानते.
या सिनेमात कंगना राणौतसोबत गिरिजा ओक, स्मिता तांबे, अमृता नामदेव, ईशा डे, प्रिया बेर्डे, आशा शेलार, सुहिता थत्ते, रसिका आगाशे, आदित्य मिश्रा आणि जाहिद खान यासारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन मनोज तापडिया यांनी केले आहे. 'भारत भाग्य विधाता' 12 जून रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.