- इराणवरील अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यामुळे तिथे असुरक्षित आणि अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे
- अभिनेत्री मंदाना करीमीने वैयक्तिक सुरक्षेच्या कारणावरून भारत सोडण्याचा निर्णय घेतला आहे
- मंदानाने भारतात धमक्या मिळाल्याचा आणि सरकार किंवा मीडियाकडून सहकार्य न मिळाल्याचा आरोप केला आहे
सध्या इराणवर युद्धाचे ढग आले आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर जबरदस्त हल्ला चढवला आहे. त्यामुळे सध्या तिथे असुरक्षित आणि अस्थिर वातावरण आहे. अशा स्थितीत ही भारतातल्या एका अभिनेत्रीने इराणला जाण्याचं ठरवलं आहे. भारताने आपला विश्वासघात केला असा आरोप करत ही अभिनेत्री देश सोडण्याच्या तयारीत आहे. आपल्याला भारतात असुरक्षित वाटत आहे असं ही तिने स्पष्ट केलं आहे. तिच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. या अभिनेत्रीच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. शिवाय ती कोण अशी विचारणा ही होत आहे.
त्या अभिनेत्रीचे नाव मंदाना करीमी आहे. हिने वैयक्तिक सुरक्षेचे कारण देत भारत सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इराणमधील राजकीय अस्थिरता आणि मानवी हक्कांच्या मुद्द्यावर मंदाना सातत्याने आवाज उठवत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या धोरणांवर तिने केलेल्या कडक टीकेमुळे तिला भारतात सातत्याने धमक्या मिळत असल्याचा तिचा आरोप आहे. मंदानानुसार, तिच्या राजकीय भूमिकेमुळे तिला समाजात एकाकी पाडण्यात आले असं तिने सांगितलं आहे.
ती म्हणते मला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. अशा कठीण प्रसंगात मला ना मित्रांची साथ मिळाली, ना सरकारची किंवा मीडियाची," अशी खंत तिने व्यक्त केली आहे. या असुरक्षिततेच्या भावनेमुळेच तिला आता भारत आपले घर वाटत नाही. त्यामुळे तिने भारत सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सोडत असली तरी इराणच्या लोकांसाठी आणि तिथल्या बदलासाठी आपला लढा परदेशातूनही सुरूच राहील, असा निर्धार तिने व्यक्त केला आहे. रेझा पहलवी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला तिने पाठिंबा दर्शवला आहे.
हे आंदोलन आता अधिक संघटित झाल्याचे तिने नमूद केले.मंदानाने इराणमधील हिजाब विरोधी आंदोलन आणि तिथल्या राजकारणावर उघडपणे भाष्य केले होते. मात्र, या प्रवासात तिला भारतात कोणाचेही सहकार्य लाभले नाही. "मला नेहमीच धमक्या मिळाल्या, पण माझ्या पाठीशी कोणीही उभे राहिले नाही. भारताने मला धोका दिला आहे, असे आता मला वाटते," अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. मंदाना सध्या इराणला जाण्याच्या विचारात असून, तिथल्या लोकांसाठी ती कोणताही त्याग करायला तयार आहे. तिने 'जाविद शाह'च्या घोषणांचा उल्लेख करत इराणमध्ये लवकरच मोठा बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.