नशीब आणि मेहनत एकमेकांवर अवलंबून असतात, असे म्हणतात. बॉलिवूड व टीव्हीची दुनियेत याची अनेक उदाहरण पाहायला मिळतात. असाच एक अभिनेता आहे ज्याने कधी कापूस विकला आहे. तर कधी इतर लहानमोठी कामे केली आहेत. पण त्याची मेहनत अखेर तेव्हा फळाला आली जेव्हा एका प्रसिद्ध वेब सीरिजमधील त्याच्या भूमिकेचे मीम्स सर्वत्र गाजले. होय, आपण बोलत आहोत पंचायत सीरिजमधील निरागस आणि भोळ्या बिनोदची. या सीरिजमध्ये मोठ्या मोठ्या कलाकारांमध्ये बिनोद बनून अशोक पाठक यांनी प्रेक्षकांना खूप हसवले. बिनोद जास्त बोलत नाही आणि कमी समजतो. बिनोद आणि भूषण म्हणजेच बन राकसच्या जोडीने लोकांना खूप हसवले. बिनोदची भूमिका साकारून अशोक पाठक यांना खूप फायदा झाला. ते कान्स (Cannes) पर्यंत पोहोचले. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंचायतमध्ये बिनोदची भूमिका साकारणारे अशोक पाठक यांनी चित्रपट आणि टीव्हीच्या दुनियेत येण्यापूर्वी खूप गरिबी पाहिली आहे. संघर्ष केला आहे. अशोक पाठक यांचा जन्म बिहारमध्ये झाला. त्यांनी गरिबी खूप जवळून अनुभवली आहे. घर चालवण्यासाठी अशोकने काकांसोबत कापसाचे गठ्ठे विकले. यातून त्यांना रोज शंभर रुपये मिळत होते. नंतर अशोकचे कुटुंब हरियाणात स्थलांतरित झाले. येथे इंटर पास केल्यानंतर अशोकने तेथील एका कॉलेजमध्ये शिक्षण सुरू केले.
येथूनच अशोकला थिएटरची आवड लागली. येथे त्यांनी कॉलेजमधील अनेक सांस्कृतिक महोत्सवांमध्ये काम केले. कॉलेजच्या एका कार्यक्रमासाठी त्यांना एकदा 40 हजार रुपये मिळाले. अशोकला वाटले की अधिक पैसे कमावण्यासाठी मुंबईला जायला पाहिजे. याच पैशातून ते मुंबईला पोहोचले. येथे अनेक ऑडिशन्स दिल्यानंतर त्यांना लहानमोठ्या भूमिका मिळत राहिल्या. मग त्यांना पंचायतमध्ये बिनोदची भूमिका मिळाली. त्या एका भूमीकेने त्यांचे आयुष्य बदलले. याच भूमिकेमुळे अशोक कान्स फिल्म फेस्टिव्हलपर्यंत पोहोचले.
आता जेव्हा पंचायतचा सीझन 4 येणार आहे, तेव्हा लोकांना सचिवजी आणि प्रधानजी यांच्यासोबत बिनोदला पाहण्याची आतुरता लागली आहे. पंचायतचे तीन सीझन आले आहेत. तिन्ही खूप गाजले. प्रेक्षकांच्या ते पसंतीला उतरले. 'पंचायत'ची कथा चंदन कुमार यांनी लिहिली आहे. व्हायरल फिव्हर कंपनीच्या बॅनरखाली बनलेल्या पंचायतमध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, फैजल मलिक, सान्विका, चंदन राय आणि दुर्गेश कुमार यांनी शानदार भूमिका साकारल्या आहेत. पंचायत फुलेरा गावातील साध्यासुध्या जीवनातील दैनंदिन अडचणी दर्शवते. शांत आणि हलक्याफुलक्या वातावरणात बनलेली ही सीरिज मानवी भावनांना अत्यंत सुंदर पद्धतीने दाखवते.